सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा! कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

| Updated on: Nov 02, 2020 | 7:44 AM

तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल! असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial On Belgaum border dispute) 

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा! कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचा  हल्लाबोल
Follow us on

मुंबई : ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, असा हल्लाबोल शिवसेनेनं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर केला आहे. तसेच सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल! असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial On Belgaum border dispute)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?

“महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी करत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा!, सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल!” असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरू आहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.

काळा दिवस पाळण्याची वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली?

सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत. रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे. कर्नाटक सरकारचा 1 नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो. हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? 20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

हा अन्याय सूर्य- चंद्राच्या साक्षीनेच झाला. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील 20 लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे.

तेथील मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी नाटय़गृहे, मराठी ग्रंथालये याबाबत अत्यंत अमानुष वर्तन स्वतंत्र भारतात केले जात आहे. 1 नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याचे तेदेखील एक कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तेथील मराठी बांधवांशी किमान माणुसकीने वागायला काय जाते? महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावातील भगवे झेंडे उतरवून ते पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे. महाराष्ट्रातील राज्यपालांनी या अत्याचारांविरोधात कर्नाटकातील राज्यपालांशी कडक शब्दांत बोलायला हवे. किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे, असा टोलाही शिवसेनेनं राज्यपालांना लगावला. (Saamana Editorial On Belgaum border dispute)

संबंधित बातम्या : 

“आघाडीपेक्षा ‘महाविकास आघाडी सरकार’ अधिक मजबूत” अनिल देशमुखांचा दावा, खडसेंसोबत नंदुरबार दौरा

पहले मंदिर फिर सरकार घोषणा देणारी शिवसेना मंदिर उघडण्यापासून दूर का जाते?,प्रवीण दरेकरांचा सवाल