एखादी नवरी घर सोडते तसा ‘वर्षा’ बंगला सोडला; संदीपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

| Updated on: Sep 25, 2022 | 9:32 AM

मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहे. हे गोचीड कोणत्याच फाईलवर सही करत नव्हते. त्यांना सांगत होते सही करू नका अडचणीत येणार. त्यामुळे कोणाचेच कामं झाले नाही.

एखादी नवरी घर सोडते तसा वर्षा बंगला सोडला; संदीपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
संदीपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती: औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांचा शिवसेना (shivsena) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरील (uddhav thackeray) हल्ला सुरूच आहे. अमरावतीत एका सभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं. आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो. तेव्हा मास्क लावून असत. आता सरकार गेलं आणि मास्कही गेला. खुर्ची गेली आणि कोरोनाही गेला. ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे. टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे, असा जोरदार हल्ला संदीपान भुमरे यांनी चढवला.

राज्यात कोरोनाचं एवढं संकट आलं. पण उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाही. आदित्य ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाही. त्यांना वेळच नव्हता. अशा मुख्यमंत्र्यांचा फायदा काय? पण एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत होते. कुणाला काय हवं नको विचारत होते. प्रत्येकाची विचारपूस करत होते. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पूर्णपणे जाळ्यात आल्याचं लक्षात आलं, तेव्हाच आमची चलबिचल सुरू झाली, असं संदीपान भुमरे म्हणाले.

आम्ही सगळ्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार केलं. आम्हाला गद्दार म्हणायचा यांना अधिकार नाही. आमचा विरोध होता जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हापासून होता. पण आमचं ऐकायला कोणीच नव्हतं, असा दावाही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

पक्षप्रमुख जर मुख्यमंत्री होत असतील तर आपण शांत राहील पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितले. पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते कोणालाही भेटायचे नाही. जर मंत्र्यांना ते भेटत नसतील तर तुम्हाला भेटणं खूपच लांब राहिलं. तुम्ही फक्त संघटना वाढवण्याचं काम करा. कोणतंही काम घेऊन येऊ नका, असं उद्धव ठाकरे सांगायचे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी आम्हाला एकदा वर्षावर भेटायला बोलावलं होतं. तेव्हा मध्येच कोणी तरी आल्याने ते उठून गेले. कोणी तरी भेटायला आले. लगेच येतो म्हणून गेले ते आलेच नाही. सांगा अशाने काही कामं होणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

माझा अनुभव सांगतो, त्यांना एका प्रकल्पासाठी मी पत्रं दिलं. एक प्रकल्प केला तर खूप फायदा होईल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असं त्यांना सांगितलं. पण अडीच वर्षे गेले त्यांनी माझं पत्रंच पाहिलं नाही.

सत्तेतील मंत्री सत्तेतून बाहेर पडले, हे देशाची पहिली घटना आहे. मी कॅबिनेट मंत्री होतो तरीही मी माझं पद धोक्यात टाकले. कारण आम्हाला शिवसेना वाचवायची होती. बाळासाहेबांचे विचार वाचवायचे होते. खरी गद्दारी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायचा त्यांना अधिकारच नाही. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरे सरकार चालवत होते, असा दावाही त्यांनी केला.

आमदार नितीन देशमुख पण आमच्या गाडीत बसले होते. तेव्हा इतक्या गप्पा मारत होते की, शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, मी पक्का देशमुख आहे. मग जेव्हा आम्ही गुहावटीला गेलो तेव्हात्याला कोणाचा तरी फोन आला आणि हा पलटला. तेव्हा त्याला एकनाथ शिंदे यांनी स्पेशल फ्लाईट करून त्याला परत पाठवलं, असा किस्साही त्यांनी सांगितला.

मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहे. हे गोचीड कोणत्याच फाईलवर सही करत नव्हते. त्यांना सांगत होते सही करू नका अडचणीत येणार. त्यामुळे कोणाचेच कामं झाले नाही, असं त्यांनी सांगितलं.

ज्यांनी कधी गाद्या उचलल्या नाही त्याला मंत्रिपद दिलं. पालकमंत्री पद दिलं मग गद्दार कोण? गद्दार आणि खोटे बस इतकंच आता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना बोलावं लागणार आहे. खरी शिवसेना ही 55 पैकी 40 आमदारांची आणि 18 पैकी 12 खासदारांची आहे, असंही ते म्हणाले.