‘बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही’, पूरग्रस्तांच्या मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

| Updated on: Jul 29, 2021 | 6:02 PM

राज्य सरकारनं बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून द्यायची, असं कसं चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती.

बहाणेबाजी बंद करा, तुम्हाला जबाबदारी झटकून चालणार नाही, पूरग्रस्तांच्या मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात
देवेंद्र फडणवीसांकडून सांगलीतील पूरस्थितीची पाहणी, पूरग्रस्तांशी संवाद
Follow us on

सांगली : राज्याला महापुराचा मोठा झटका बसल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करत आहेत. ते आज सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. राज्य सरकारनं बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून द्यायची, असं कसं चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, असं आव्हान फडणवीस यांनी केलंय. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for helping flood victims)

जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्यामुळेच यंदा अधिक नुकसान झालं. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरस्थितीबाबत वडनेरे समितीनं जो अहवाल तयार केला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. तसंच फडणवीस यांनी यावेळी जयंत पाटील यांची प्रकृती लवकर सुधारावी अशा शुभेच्छाही दिल्या आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ब्रिच कँडी रुग्णालय गाठलं होतं. त्यानंतर आज त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती स्वत: पाटील यांनीच दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जयंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणात सरकारला प्रतिसवाल

फोन टॅपिंग झाले त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. मग आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन कसं काम होऊ शकेल? असा सवालही फडणवीस यांनी केलाय. रश्मी शुक्ला यांच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन फोन टॅपिंग झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. त्यावर फडणवीस यांनी हा प्रतिसवाल केला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा – फडणवीस

दुसरीकडे केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. ऑल इंडिया कोट्यातून ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नसल्यानं अनेक ओबीसी मुलं डॉक्टर होण्यापासून वंचित राहत होती. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं फडणवीस म्हणालेत.

संबंधित बातम्या :

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा? नितेश राणेंचा रोहित पवारांना खोचक टोला

मुख्यमंत्री कोयनेला पोहोचू शकत नाहीत, दिल्लीला काय पोहोचणार, संदीप देशपांडेंकडून खिल्ली

Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government for helping flood victims