अभी ज़रा बाज़ आएँ।, संजय निरुपमांनी राष्ट्रवादीला फटकारले; मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून जुंपली

| Updated on: Apr 26, 2021 | 11:27 AM

राज्यात मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. (sanjay nirupam attacks ncp over free vaccination)

अभी ज़रा बाज़ आएँ।, संजय निरुपमांनी राष्ट्रवादीला फटकारले; मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून जुंपली
sanjay nirupam
Follow us on

मुंबई: राज्यात मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या लसीकरणाच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तर राष्ट्रवादीला थेट अभी जरा बाज आए, असा इशारा दिला आहे. तसेच राष्ट्रवादीने मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करणं कितपत योग्य आहे, असा सवालही केला आहे. (sanjay nirupam attacks ncp over free vaccination)

संजय निरुपम यांनी ट्विट करून राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. थोडसं वेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत क्रेडिट घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, अभी ज़रा बाज़ आएँ।, अशी टीका निरुपम यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारच्या निर्णयाचं श्रेय घेतलं जात असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे. निरुपम यांनी थेट राष्ट्रवादीला नाव घेऊनच डिवचल्याने त्यावर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

मलिक काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

पडळकरही बरसले

मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील गोंधळावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही टीका केली आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. (sanjay nirupam attacks ncp over free vaccination)

 

संबंधित बातम्या:

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण, नवाब मलिक यांची माहिती

मुंबईत घरोघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार: महापौर किशोरी पेडणेकर

(sanjay nirupam attacks ncp over free vaccination)