‘भाजप तामिळनाडू, प. बंगालमध्ये निवडणूक लढतोय आणि आमचे नेते आपसांत’! संजय निरुपमांचा काँग्रेसला घरचा आहेर

| Updated on: Nov 23, 2020 | 4:28 PM

काँग्रेस नेतृत्वाला सल्ला देताना संजय निरुपम यांनी एक ट्वीट केलं आहे. 'जोपर्यंत पक्षनेतृत्व कंबर कसून पुढे येत नाही, तोपर्यंत कायकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही. आता एक उपाय आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ पक्षाचं नेतृत्वं करावं आणि संघटनेत अमुलाग्र बदल करावा', अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

भाजप तामिळनाडू, प. बंगालमध्ये निवडणूक लढतोय आणि आमचे नेते आपसांत! संजय निरुपमांचा काँग्रेसला घरचा आहेर
Follow us on

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस अंतर्गत जोरदार घमासान सुरु आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर निशाणा साधला. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या या अंतर्गत वादावरुन संजय निरुपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. भाजप तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे आमचे नेते आपसांत लढत आहेत, अशा शब्दात निरुपम यांनी स्वकीयांवर आगपाखड केली आहे. (Congress leader Sanjay Nirupam’s criticism of senior party leaders, Rahul Gandhi’s demand for leadership)

काँग्रेस नेतृत्वाला सल्ला देताना संजय निरुपम यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘जोपर्यंत पक्षनेतृत्व कंबर कसून पुढे येत नाही, तोपर्यंत कायकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही. आता एक उपाय आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ पक्षाचं नेतृत्वं करावं आणि संघटनेत अमुलाग्र बदल करावा. मेहनती आणि ऊर्जा असलेले नेते, कार्यकर्त्यांना पुढे आणावं. त्यावेळी नक्की चमत्कार पाहायला मिळेल’, असं ट्वीट निरुपम यांनी केलं आहे.

तर ‘भाजप तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवत आहे आणि आमचे ज्येष्ठ नेते आपसांत लढत आहेत. ते ही सार्वजनिकरित्या! हे तेच नेते आहेत, जे अनेक वर्षांपासून AICC वर कब्जा करुन बसले आहेत. जेव्हा चांगलं झालं तेव्हा श्रेय घेतलं. आता वाईट झालं तर टीका करत आहेत. ज्येष्ठ नेत्यांची नेतृत्वाप्रती घटत जाणारी आस्था पक्षाला कमकुवत करेल’, अशा शब्दात निरुपम यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधणाऱ्या कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

‘आझाद यांना पक्षातून ‘आझाद’ करा’

काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर घमासान सुरु झालं आहे. गुलाम यांना पक्षातून ‘आझाद’ करा, अशी थेट मागणी हरियाणाचे काँग्रेस आमदार आणि युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव चिरंजीव राव (Chiranjeev Rao) यांनी केली आहे. अशा संधीसाधू नेत्यांना तातडीने पक्षातून काढून टाकण्याची विनंतीही उत्तर प्रदेशातील काँग्रेस पदाधिकाऱ्याने केली आहे.

फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत- आझाद

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या फाईव्ह स्टार कल्चरवरही हल्लाबोल केला. कोणतीही निवडणूक फाईव्ह स्टार कल्चरने लढवली जात नाही. आज नेत्यांना तिकीट मिळताच ते फाईव्ह स्टार हॉटेल बुक करतात. जोपर्यंत पक्षातील हे फाईव्ह स्टार क्लचर बदललं जात नाही. तोपर्यंत निवडणुका जिंकता येणार नाहीत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले. पदाधिकाऱ्यांना आपली जबाबदारी समजली पाहिजे. जोपर्यंत पक्षात पदाधिकारी नियुक्त केले जातील तोपर्यंत हे असंच चालणार. पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकारी निवडून आले तरच त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. आता तर पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत; आझाद यांचे खडेबोल

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर

गुलाम नबी आझाद यांना पक्षातून ‘आझाद’ करा, काँग्रेस नेत्यांची थेट मागणी

Congress leader Sanjay Nirupam’s criticism of senior party leaders, Rahul Gandhi’s demand for leadership