Sanjay Rathod : आघाडी सरकारनेच संजय राठोडांना क्लिनचीट दिलीय; विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

| Updated on: Aug 09, 2022 | 5:26 PM

Sanjay Rathod : संजय राठोडांच्या मुद्द्यावर कुणालाही अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार नाही. जे आरोप राठोडांवर झाले आहेत, ते काही सिद्ध झालेले नाहीत. तपास यंत्रणांकडून राठोड यांना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर परत आरोप करणं योग्य नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Rathod : आघाडी सरकारनेच संजय राठोडांना क्लिनचीट दिलीय; विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
आघाडी सरकारनेच संजय राठोडांना क्लिनीचीट दिलीय; विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विस्तारात (Cabinet Expansion) माजी मंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच गहजब उठला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचं नाव आलं होतं. त्यामुळे राठोड यांना मंत्रिपद गमवावं लागलं होतं. त्यानंतर भाजपशी (bjp) युती होताच पुन्हा एकदा राठोड यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही आपल्याच सरकारवर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. संजय राठोडांविरोधातील लढा असून संपलेला नाही. हा लढा सुरूच राहणार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांची पाठराखण केली असून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आता काम सुरू होईल. सर्व मंत्री आपआपल्या विभागाचा कारभार स्वीकारतील. राज्यातील जनतेला जे अपेक्षित आहे. ते काम करतील. लोकाभिमुख काम करतील. हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. सर्व सामान्यांचं सरकार आहे, असं सांगतानाच मागच्या सरकारमध्ये पोलिसांनीच राठोडांना क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. त्या उपरांत कुणाला काही म्हणायचं असेल तर निश्चित रुपाने त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एक प्रकारे शिंदे यांनीही राठोड यांची पाठराखण करत त्यांना क्लिनचीट दिली आहे.

हे सुद्धा वाचा

बीड आणि यवतमाळमध्ये जल्लोष

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्री मंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश करण्यात आल्याने बीडमधील राठोड समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे. शहरातील जय सेवालाल महाराज चौकात पेढे भरवून, फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थनात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली.

बीडपाठोपाठ यवतमाळमध्येही राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जल्लोष करण्यात आला आहे. राठोड यांच्या दारव्हा-दिग्रस मतदारसंघातील त्यांच्या कार्यालयाबाहेर जमून राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राठोड समर्थकांनी एकमेकांना पेढा भरवत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. तर काहींनी बँडच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला आहे.

राठोडांवर बोलण्याचा कुणाला अधिकार नाही

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यावर टीका होत आहे. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधाला विरोध करणं हीच विरोधकांची भूमिका असते. संजय राठोडांच्या मुद्द्यावर कुणालाही अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार नाही. जे आरोप राठोडांवर झाले आहेत, ते काही सिद्ध झालेले नाहीत. तपास यंत्रणांकडून राठोड यांना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर परत आरोप करणं योग्य नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. चित्राताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांनी जे काही विधान केलं किंवा ट्विट केलं. त्यावर भाजपच उत्तर देईल, असंही त्यांनी सांगितलं.