भाजपशासित राज्यांत राज्यपालांकडून अस्थिरता निर्माण का केली जात नाही? संजय राऊतांचा सवाल

| Updated on: Oct 15, 2020 | 1:24 PM

ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटतं, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

भाजपशासित राज्यांत राज्यपालांकडून अस्थिरता निर्माण का केली जात नाही? संजय राऊतांचा सवाल
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्यपालाच्या भूमिकेत राहून काम करावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. “भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. (Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावं. भाजपशासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यातच असा प्रयोग का केला जात आहे? आपल्या सरकारचा मुख्यमंत्री नसला की संघर्ष करायचा. राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानात राहून काम करावं” असं संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचित करताना ठणकावून सांगितलं.

“पश्चिम बंगालचे राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करत आहेत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? भाजपशासित राज्यात मंदिरं का उघडली नाहीत?” असा सवालही त्यांनी विचारला.

“मूर्खांच्या नंदनवनात फिरु नका”

राजकीय भूमिकेत राहून राज्यपालांनी काम करु नये. पंतप्रधान, राज्यपाल ही सर्व धर्मनिरपेक्ष पदं आहेत. आपली घटनाही धर्मनिरपेक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याने सर्वांना अडचण होत आहे. कट कारस्थान करुन सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल, तर मूर्खपणाचं आहे. ज्यांना महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल असं वाटतं, त्यांनी मूर्खांच्या नंदनवनात फिरु नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रावर निसर्गाचं संकट आहे. पूरस्थितीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करणार आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. बिहारमध्ये शिवसेना 40 जागा लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली. (Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)

संबंधित बातम्या :

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचणारं हेच ते राज्यपालांचं पत्र

(Sanjay Raut advices Governor of Maharashtra to remain in limits)