मुंबईः 32 वर्षाच्या तरुणाने अर्थात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आव्हान दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप व्हायला सुरुवात झाली आहे. याचेच परिणाम म्हणून वरळीतील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे न येता अवघा लवाजमा घेऊन येत आहेत. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना सोबत घेऊन येत आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. वरळी कोळीवाडा येथील मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 7 वाजता वरळी स्पोर्ट्स ग्राउंडवर हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
वरळी विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे आमच्या ३२ वर्षाच्या नेत्यानं आव्हान दिलं, त्यानंतर त्यासंदर्भात राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालीय, तो मजेशीर आहे.
वरळीत मुख्यमंत्री एकटे येत नाहीत, जोडीला गृहमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही घेऊन येतायत… आनंद आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘ जे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलंय, त्यासंदर्भात आम्ही ठाम आहोत. तुम्ही राजीनामा द्या, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन वरळीत यायला हवं. पण ते मुख्यमंत्री पदावर राहून, लवाजमा घेऊन येतायत. त्यांचे हजार बाराशे पोलीस खुर्च्यांवर बसणार…. असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
या निमित्ताने त्यांचे पाय वरळीला लागतायत, याचा आनंद आहे. परत सांगतो, राजीनामा देऊन येण्याची वाट पाहतो. 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं, हे वरळीत महाराष्ट्र पाहिल, असं संजय राऊत म्हणाले.
वर्ध्याच्या साहित्य संमेलनात बुजूर्ग अध्यक्ष न्या. चपळगावकर यांनाच पोलिसांनी अडवलं. कार्यक्रम स्थळी जाऊ दिलं नाही. तसं वरळीतही कोळी समाजाला अडवून यांचे लोक कोळ्यांच्या वेशात जाऊन बसतील असं चित्र दिसतंय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
आम्ही मोदींची माणसं आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात वरळीत मोदी सेना येणार आहे, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
कसबा-चिंचवड या दोन्ही ठिकाणी निवडणुका होतील. भाजपाची अजूनही धडपड दिसतेय. त्यामागील अस्वस्थता स्पष्ट दिसतेय. दोन्हीचं चित्र भाजपला अनुकूल नाही. ज्या आमदारांचं निधन झालंय, त्या टिळक-जगतापांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. तरीही लोकांना बदल हवा असेल तर निवडणुका होणं गरजेचं आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.