तर ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’बाबत राज्यसभेत वेगळा निर्णय : संजय राऊत

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असं संजय राऊतांनी सुचवलं

तर नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळा निर्णय : संजय राऊत
| Updated on: Dec 11, 2019 | 11:46 AM

नवी दिल्ली : आम्हाला कुणीही राष्ट्रभक्ती शिकवू नये, जे मानवतेच्या हिताचं आहे, तोच आमचा निर्णय असेल, असं शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. लोकसभेत ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’ला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असे संकेत राऊतांनी (Sanjay Raut on Citizenship amendment bill) दिले.

नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत आम्ही सदनात (राज्यसभा) आमचा मुद्दा मांडू, सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळालं, तर ठीक, अन्यथा आमचा निर्णय वेगळा असेल. लोकसभेतील संख्याबळ वेगळं होतं, राज्यसभेत वेगळी स्थिती आहे. तेव्हाचा निर्णय तेव्हा घेऊ, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला कुणीही राष्ट्रभक्तीबाबत मार्गदर्शन करु नये. जितका त्याग तुम्ही केला, त्यापेक्षा जास्त आम्ही केला. दर वेळी पाकिस्तानची भाषा, बांगलादेशची भाषा.. या देशाचीही एक भाषा आहे. नेपाळमध्ये हिंदूंची अवस्था बिकट आहे. श्रीलंकेतील हिंदूंना का वगळलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले.

आपल्या देशाचे नागरिकही राष्ट्रभक्त आहेत, त्यांना कुठल्याही शाळेत राष्ट्रभक्ती शिकण्याची गरज नाही. आम्हीही खूप काही सहन केलं आहे. तुम्ही व्होट बँकेचं राजकारण करु नका. शिवसेनेवर कोणीही दबाव टाकू शकत नाही. जे आमच्या मनात असतं, तेच आमच्या ओठातही असतं. जे मानवतेच्या हिताचं तोच आमचा निर्णय असेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर लोकसभेत घमासान, कुणाचं काय म्हणणं?

नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आम्हाला काही स्पष्टता हव्या आहेत आणि त्या होत नाहीत, तोवर या विधेयकाला राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतली.

या विधेयकाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरं दिली. ‘नव्याने नागरिकत्व मिळालेले लोक कुठे राहणार आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार हे राज्यांना कळलं पाहिजं. विधेयकाला समर्थन म्हणजे देशभक्ती आणि विरोध म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी प्रथम बाहेर यावं’, असे ठाकरे म्हणाले.

देशाच्या भवितव्यासाठी विधेयकावर विस्तृत चर्चा व्हायला हवी, या विधेयकाबाबत शिवसेनेने कोणती भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी (Sanjay Raut on Citizenship amendment bill )लगावला.