अखेर शरद पवार यांच्यावर आयुष्यभर लागलेला ‘तो’ डाग पुसला; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं. त्या घोटाळ्याला जबाबदार अजित पवार आहे. शरद पवार नाही. अजित पवार ईडीला धारिष्ट्याने फेस करणारे नाहीत. ते लपून राहणारे आहेत. आताही ते लपून राहण्यासाठी आश्रयाला गेले आहेत.

अखेर शरद पवार यांच्यावर आयुष्यभर लागलेला तो डाग पुसला; शालिनीताई पाटील यांचं सर्वात मोठं विधान
shalini patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 09, 2023 | 8:22 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वारंवार सांगितलं जातं. राजकीय विरोधकांकडून तर या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. या विषयावर शरद पवार यांनी वारंवार खुलासाही केला आहे. त्यावेळी काय घडलं होतं, नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती शरद पवार यांनी सातत्याने दिली आहे. मात्र, तरीही शरद पवार यांना खलनायक केलं जात आहे. आता अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांना त्यांच्या त्या बंडाची आठवण करून दिली जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे पवारांवरील तो डाग पुसला गेल्याचं सांगितलं जात आहे.

शालिनीताई पाटली यांनी मीडियाशी संवाद साधताना ही क्लिनचीट दिली. शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज पेरलं तेच उगवलं असं वाटतं का? असा सवाल शालिनीताईंना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं.

अहो कितीवेळ ते घेऊन चालायचं? खुद्द ज्यांच्या बद्दल अपराध केला, त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही शरद पवार यांचं नेतृत्व माना. वसंतदादा पाटील यांना राज्यपालपद देण्यात आलं होतं. राज्यपाल म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी माझ्यासह काँग्रेसच्या त्यावेळच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावलं. तुम्ही इथून पुढे शरद पवारांच्या नेतृत्वात काम करा. घडलेलं विसरून जा आणि शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारा, असं आम्हाला सांगितलं होतं, असं म्हणत शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांना क्लिनचीट दिली आहे.

शरद पवारच योग्य नेता

शरद पवार त्याकाळात वसंतदादांविरोधात वागले. मीही पवारांच्या विरोधात बोलायचं ते बोलले. शेवटी वसंतदादा राजकारण सोडून राज्यपाल व्हायला गेले. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करा असं सांगितलं. म्हणजे वसंतदादांनाही शरद पवार हाच काँग्रेसमधील योग्य नेता दिसला. त्यांनी स्वत: सांगितलं त्यांच्या नेतृत्वात काम करा, असंही त्या म्हणाल्या.

अजितदादा उथळ

मी वसंतदादांचा आदेश मानला. तेव्हापासून शरद पवार यांच्याच बरोबर आहे. शरद पवार यांच्या वागण्याला तात्त्विक बेस आहे. अजित पवार यांचं वागणं उथळ आहे. अजितला फिलॉसॉफी नाही. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह घेतलं नाही. नव्या पिढीला सर्व सोपं पाहिजे. लगेच पाहिजे. निवडणुकीला उभं राहायला गेले तर थेट लोकसभेसाठी काम करायचं असतं. पार्थ पवारही लोकसभेला उभा राहिला. खरं तर जिल्हा परिषदेपासून सुरूवात केली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

ते भाजपचा विश्वासघात करणार नाही का?

अजित पवारांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणणार नाही. पण अजितने शरद पवार यांना विचारायला हवं होतं. सल्ला घ्यायला हवा होता. सख्ख्या काकाला सोडून रात्रीच्या अंधारात शपथ घेतात, ते उद्या भाजपचा विश्वासघात करणार नाही का? काकांचा विश्वासघात करतात ते दुसऱ्यांचा का करणार नाही? असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us