मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी आणि भाजप-शिवसेना यांच्या युतीमध्ये प्रमुख लढत आहे. शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या एकत्र सभा झाल्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची एकत्र सभा झाली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या व्यासपीठावर यायचं नव्हतं म्हणून एकत्र सभा झाली नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
मुंबईतील बीकेसीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेला शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मुंबईतील युतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. योग्य ठिकाणी तुमचं मत द्या, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
“वाराणसीमध्ये मी पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी गेलो, गुजरातमध्येही भाजपाध्यक्ष अमित शाहांना भेटायला गेलो. मुख्यमंत्री आणि माझी एकत्रित सभा झाली. आज महायुतीची सभा मुंबईत होत आहे. पण काँग्रेसच्या अध्यक्षांनी मुंबईत येणंच सोडलंय. शरद पवारांना राहुल गांधींसोबत एका व्यासपीठावर यायचं नव्हतं, म्हणून त्यांची एकही एकत्रित सभा झाली नाही, जे मनाने एकत्र येऊ शकत नाहीत, ते सरकार बनवायला काय एकत्र येणार?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील नागपूर, वर्धा या ठिकाणी सभा घेतल्या. त्यानंतर नांदेडमध्येही सभा झाली. पण त्यांनी मुंबईत सभा घेतली नाही. चौथ्या टप्प्यातील प्रचारात राहुल गांधींची नगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये सभा झाली. या सभेसाठी राष्ट्रवादीचे नेते छनग भुजबळही उपस्थित होते. पण शरद पवार आणि राहुल गांधींची एकही एकत्रित सभा झाली नाही.
VIDEO : उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण