पुलवामाची पुनरावृत्ती झाली नाही, तर राज्यात सत्ताबदल अटळ : शरद पवार

| Updated on: Sep 21, 2019 | 9:24 AM

या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे.' असं शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पुलवामाची पुनरावृत्ती झाली नाही, तर राज्यात सत्ताबदल अटळ : शरद पवार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे (Sharad Pawar Emotional Appeal) , अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला भावनिक साद घातली आहे. शुक्रवारी रात्री पवारांनी ट्विटरवरुन ही पोस्ट शेअर (Sharad Pawar Emotional Appeal) केली.

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील वातावरण बदललं. मी काही निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी हल्ल्याबाबत शंका व्यक्त केली. त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकसभा निवडणुकी आधी ही घटना घडली, त्यानंतर देशात वातावरण बदललं, विधानसभा निवडणुकीआधी असा प्रकार घडला नाही, तर राज्यात बदल होईल अशी शक्यता शरद पवार यांनी बोलून दाखवली.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचे दिग्गज मोहरे पक्षाला रामराम ठोकून सत्ताधारी भाजपची वाट धरत आहेत. अशावेळी ‘जाणता राजा’ म्हणून समर्थकांमध्ये ओळखले जाणारे शरद पवार एकाकी पडल्याची भावना बोलली जात आहे. वयाच्या 78 व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या ध्यास घेत मैदानात उतरले आहेत.

‘या वयात तुम्ही का फिरता असे मला म्हणतात. पण माझे काही वय झालेले नाही. नवी पिढी, शेतकरी, कामगार, भटके, अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासींना पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्र व देशाला पुढे नेण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. तेच कष्ट मी करतो आहे.’ असं शरद पवारांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

‘महाराष्ट्राने मला भरभरून दिलं. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केलं, देशाचा संरक्षण मंत्री केलं, 10 वर्षे कृषीमंत्री केलं. जनतेने मला भरभरून दिलं आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे.’ अशा शब्दात पवारांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.

 

‘ते काहीही बोलण्याइतके कर्तृत्ववान आहेत. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीमधील महत्वाचं पद आहे. या पदाची मला किंमत ठेवायची आहे. या पदाची मला अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही,हे मी मुद्दाम सांगतो.’ असं सांगत पवारांनी पंतप्रधानांना प्रत्युत्तर न देण्यामागील कारण स्पष्ट केलं.

‘विकासाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरून जावं असा प्रश्न येतो तेव्हा शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येतं.’ हे पंतप्रधान @narendramodi म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरून चालता. मग निवडणूक आली की असं बोलता. हे वागणं बरं नव्हं. हे बोलणं योग्य नाही.’ असंही पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

पवारांच्या ट्वीटवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कोणी पवारांना काळजीपोटी आराम करण्याचा सल्ला देत आहे. सुप्रिया सुळे-अजित पवारांसारख्या राजकीय वारसदारांवर काम सोपवून आपण निश्चिंत व्हावं असं काही जणांचं म्हणणं आहे. जनता आपल्या पाठीशी असल्याचं काही नेटिझन्स सांगतात.

दुसरीकडे, बारामती सोडली, तर तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलंत? असा जळजळीत सवालही काही ट्विटराईट्सनी विचारला आहे. पाकिस्तानचा पुळका आल्याबद्दलही काही जणांनी पवारांवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानातून आयात कधीच बंद, शरद पवारांना चुकीची माहिती : नाफेड

माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही : धनंजय मुंडे

पवारांच्या रणनीतीने साताऱ्यात दोन्ही राजेंचा मार्ग खडतर

काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन आमदार राजीनामा देणार, भाजपमध्ये प्रवेश करणार – सूत्र

अजित पवारांची डोकेदुखी वाढली, इंदापुरातच राष्ट्रवादीतून बंडाचं निशाण