अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले

| Updated on: Nov 24, 2019 | 6:49 PM

भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं

अजित पवारांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं, शरद पवार कडाडले
Follow us on

मुंबई : ‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य खोटं आणि दिशाभूल करणारं आहे’, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं (Sharad Pawar on Ajit Pawar Rebel) आहे. अजित पवारांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीसोबत असल्याचा दावा केल्यानंतर पवारांनीही ट्विटरवरुनच आपली भूमिका मांडली.

‘भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने सरकार स्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री अजित पवार यांचं विधान हे खोटं, संभ्रम निर्माण करणारं, तसंच लोकांची दिशाभूल करणारं आहे.’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. या ट्वीटलाच शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार पुढे म्हणाले.

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजित पवारांनी एकामागून एक ट्वीट करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल’ असं त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले.

त्यानंतर राष्ट्रवादीसोबत असल्याचं सांगत अजित पवार यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवारांनी परतण्याची तयारी दर्शवली नव्हती.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु पक्षातील त्यांचं सदस्यत्व कायम (Sharad Pawar on Ajit Pawar Rebel) आहे.