भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे का?, शरद पवार म्हणतात….

| Updated on: Nov 15, 2019 | 1:19 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar visits wet drought affected area) हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत.

भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे का?, शरद पवार म्हणतात....
Follow us on

 नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar visits wet drought affected area) हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी नागपुरात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी  (Sharad Pawar visits wet drought affected area)  आज पत्रकार परिषद घेऊन शेती नुकसान, भरपाईचे पर्याय, सध्याची राजकीय परिस्थिती याबाबतची माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, “परतीच्या पावसामुळे जे नुकसान झालं त्यामुळे मी इथे आलो आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे मी आधी नागपूर जिल्ह्यात पाहणीसाठी येऊ शकलो नाही.- अवकाळी पावसामुळे धान, कापूस, संत्राबागेला मोठा फटका बसला आहे. 60 ते 70 टक्के संत्री गळून पडली आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं त्याचाच सर्व्हे केला आहे. नागपूर जिल्ह्यात 44213 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे, तब्बल 88000 शेतकऱ्यांना फटका बसला आहे”

नुकसानीचे जे आकडे दिले जात आहेत, त्यापेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. नागपूरपेक्षा विदर्भातील इतर भागात मोठं नुकसान झालं आहे, असं शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारशी लवकरात लवकर चर्चा करुन, लवकरच केंद्रीय कृषी मंत्रालयाने बैठक बोलवावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने बैठक घेऊन चर्चा करावी, असं आवाहन शरद पवारांनी केलं.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याचा प्रयत्न करणार. केंद्र सरकारकडून काही रक्कम कमी व्याजाने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करु, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र सरकार 10 हजार कोटी देईल असं मला वाटत होतं, पण आता ही मदत केंद्राकडून मागत आहेत. सरकारनं सरसकट पंचनामे करावे. नुकसानीबाबत केंद्राकडे मदत मागणीबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

आमच्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा होता, यावर कसं करायचं ते आम्ही बघू, असं म्हणत शेतकरी कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

शिवसेनेसोबतच्या चर्चेची माहिती नाही
काँग्रेस-राष्ट्रवादी नेहमी धर्मनिरपेक्षतेबाबत बोलतात. काल शिवसेनेसोबत बैठक झाली, मात्र काय चर्चा झाली मला माहित नाही, असं पवार म्हणाले.  राज्यात स्थिर सरकार यावं हाच आमचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले.

फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार,  हेच माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी बऱ्याच दिवसांपासून ओळखतो, पण ते ज्योतिष शास्त्राचे जाणकार आहेत हे माहित नव्हतं, असा टोला पवारांनी लगावला.

भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार का?

सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याची शक्यता आहे का?  असा प्रश्न यावेळी शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा सुरु आहे. त्याबाहेर काहीही नाही, असं म्हणत भाजपसोबतच्या चर्चांवर पडदा टाकला.

महासेनाआघाडीचं हे सरकार पाच वर्षे चालणार, मध्यावधी निवडणूक होणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  जनतेनं बहुमत दिलं असतं तर अशी चर्चेची वेळ आली नसती. सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.