‘भाजपच्या सत्तेच्या काळातच काश्मिरी पंडितांचं विस्थापन’, पवारांचं वक्तव्य; विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

| Updated on: Mar 27, 2022 | 8:34 PM

शरद पवार यांनीही द काश्मिर फाईल्स चित्रपटावरुन भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. सध्या विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याची खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केलीय.

भाजपच्या सत्तेच्या काळातच काश्मिरी पंडितांचं विस्थापन, पवारांचं वक्तव्य; विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप
शरद पवार यांची काश्मिर फाईल्सवरुन भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरुन देशभरातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. भाजपकडून या चित्रपटाचं जोरदार समर्थन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या चित्रपटाचं कौतुक केलंय. तर विरोधकांकडून चित्रपटासह भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही द काश्मिर फाईल्स चित्रपटावरुन भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. सध्या विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याची खंतही पवार यांनी यावेळी व्यक्त केलीय. पुण्यात आज माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते.

टीका करताना विद्वेष नसावा – पवार

शरद पवार म्हणाले की, विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, टीका करताना विद्वेष नसायला हवा. मात्र अलिकडे तेच अधिक पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जात आहे. काश्मिरमधील एक घटक निघून गेला. त्यावर एक चित्रपट आला, काँग्रेसवर टीका झाली. मात्र, या चित्रपटामुळे मनं जोडण्याऐवजी मनं तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरवायला मदत केली जाते. पंतप्रधानांकडूनही त्यावर भाष्य केलं जातं. या चित्रपटाच्या माध्यमातून गांधींवर टीका-टिप्पणी केली जाते, असं शरद पवार म्हणाले.

‘भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडितांचं विस्थापन’

काश्मिरमधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती. तर व्ही. पी. सिंग यांचं सरकार होतं. भाजपचं त्यांना सहकार्य होतं. म्हणजेच भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा दावाही पवारांनी केलाय. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरुंनी देशाला दिशा दिली, नुसते स्वातंत्र्य दिले नाही. देशाला महत्व देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. देशाला एकसंध ठेवायचं आहे, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं द काश्मिर फाईल्सचं कौतुक

द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्च रोजी, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपटाचे निर्माते अभिषेक यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी त्यांचं अभिनंदन करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं. “द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात”, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केलं. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या : 

केंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात अतिरेक, सुप्रिया सुळेंचं पुढचं पाऊल; गृहमंत्री अर्थमंत्र्यांकडे तक्रार

सांगलीत गोपीचंद पडळकरांनी डिजीटल गनिमी कावा नेमका कसा साधला? पाहा Video