Maharashtra Politics | या आधी दोनदा सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, शरद पवारांचं मोठं विधान

| Updated on: Jun 21, 2022 | 2:25 PM

महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. मात्र शिवसेनेत सुरु झालेली बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Maharashtra Politics | या आधी दोनदा सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, शरद पवारांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पाडण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलंय. विरोधी पक्षातील भाजपने याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना इतरत्र नेऊन ठेवण्यात आलं होतं. मात्र तेथूनही आमदार परत आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. आज महाराष्ट्रात निर्माण झालेल्या स्थितीतूनही काहीतरी मार्ग निघेल, मला विश्वास आहे, असं वक्तव्य शरद पवार यानी केलं. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी विरोधक पक्षांची एक बैठक दिल्लीत बोलवली आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर पवारांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले शरद पवार ?

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात जे काही झालं आहे. गेल्या अडीच वर्षातील ही तिसरी घटना आहे. या पूर्वी दोन झाले होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार बनलं त्यापूर्वी आमच्या काही आमदारांना हरयाणा बुधगावात नेऊन ठेवलं होतं. नंतर तिथून ते आले आणि सरकार बनवलं. त्यानंतर अडीच वर्षापासून सरकार व्यवस्थित झालं. काल तिकडे निवडणूक होते. एनसीपीच्या दोन्ही उमेदवारांचा कोटा ठरला होता. तो कायम राहिला. एकही मत इकडचं तिकडं झालं नाही. कालच्या घटनेवरून आम्ही नाराज नाही. पण आमच्या आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. त्याचं दुःख आहे. इतर राजकीय पक्षांचं कोटा होता. त्यांनी मत द्यायला हवं होतं ते दिलं नाही. असं का झालं याची चर्चा करणार आहोत…

शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. मात्र शिवसेनेत सुरु झालेली बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. आज दुपारी आम्ही डेप्थ स्टडी करू. त्यानंतर संध्याकाळी बोलू असा मला शिवसेनेकडून निरोप आला आहे. आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे. इतर मंत्रालये काँग्रेसकडे आहेत. शिवसेनेने काही करणं किंवा कुणाला संधी देणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना कुणाला काही देत असेल तर आम्ही शिवसेनेच्या निर्णयाला पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवलं आहे. त्यामध्ये काही बदल करण्याची आम्हाला गरज वाटत नाही.