
मुंबई : अखेर शनिवारी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत करता येणार नाहीये. तसेच शिवसेना (Shiv sena) हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवरांनी यावेळी लगावला आहे. ठाकरेंची शिवसेना संपणार नाही, तर पक्ष अधिक जोमाने वाढेल असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पूर्वी शिवसेनेतून जे बाहेर पडले ते कधीही शिवसेनेच्या मुळावर उठले नाहीत. मात्र शिंदे गट शिवसेनेच्या मुळावर उठला आहे. परंतु उद्धव ठाकरे हे सक्षम नेतृत्व असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.