बंडाळीला सुरुवात? शिंदे गटाच्या बैठकीत आमदारांची एकमेकांना शिवीगाळ, अंगावरही धावले?; विनायक राऊत यांचं धक्कादायक विधान

गद्दारी केल्यानंतर गद्दारांना कंठ फुटतो. त्यामुळे या राजकीय विकृतीला जन्म दिलाय. मूळ भाजप राहिलेला नाही. उपऱ्यांच्या ताटात पंचपक्वान्न वाढलेली आहेत. हे सरकार म्हणजे तीन चाकी टॅम्पो आहे. 

बंडाळीला सुरुवात? शिंदे गटाच्या बैठकीत आमदारांची एकमेकांना शिवीगाळ, अंगावरही धावले?; विनायक राऊत यांचं धक्कादायक विधान
vinayak raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 06, 2023 | 12:49 PM

रत्नागिरी : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदावर डोळा ठेवून बसले होते. त्यांनी कपडेही शिवले होते. आपली वर्णी लागणार नाही हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे. राहिलेल्या मंत्रीपद वाटपात तीन वाटे होतील. त्यात फक्त दोन जागा शिंदे गटाला मिळणार आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची आस लावून असलेले बाकीचे आमदार ताटकळत बसलेले असतील. त्यामुळे या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. काल शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत हे आमदार एकमेकांवर धावून गेले. अनेकांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचंही ऐकलं. मुख्यमंत्र्यांच्या अंगावर काहीजण धावून गेले. असं ऐकलं आहे. नक्की माहिती नाही, असं मोठं आणि धक्कादायक विधान विनायक राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

विनायक राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटातील 8 ते 10 आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. अजितदादा आणि कंपनीने उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटाच्या आमदारांची बंडखोरी करायला सुरुवात झाली आहे. त्यांचा उद्रेक होत आहे. तो थांबवताना एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. आमचं पूर्वीचं घरच बरं होतं. मातोश्रीने साद घातली तर सकारात्मक प्रतिसा देऊ असं विधान काही मंत्र्यांनी केलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आमदारांनी मातोश्रीशी संपर्क केला. मातोश्रीची क्षमा मागायलाही हे आमदार तयार आहेत, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

शब्दच येत नाही

सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करण्यासाठी शब्दच येत नाही. गलिच्छ राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची बदनामी आहे. किळसवाणे राजकारण आहे. फुटीला काळिमा महाराष्ट्राला लागला आहे. कुटुंब फुटीचाच नाही तर गलिच्छ राजकारणाचा काळिमाही राज्याला लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे तुच्छतेने पाहिले जात आहे, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरेच निर्णय घेतील

शिंदे गटातील अनेक आमदारांनी संपर्क साधला आहे. मातोश्रीची माफी मागायलाही ते तयार आहेत. पण गद्दारांना परत घेऊ नये अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. आठ ते दहा आमदारांनी प्रत्यक्ष संपर्क साधलाय, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असंही ते म्हणाले.

पवारांना कोणी हरवू शकत नाही

शरद पवार यांना कुणी हरवू शकत नाही. महाविकास आघाडीत फूट पडलेली नाही. दुर्देवाने पक्ष चोरांची टोळी उभी राहिली आहे. केवळ आणि केवळ केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. संविधान राहिलं नाही. भाजपने गद्दार या नवीन शब्दाला जन्म दिला आहे. भाजपची ही कपटनीती 70 हजार कोटींच्या प्रतापामुळे झाली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर

उद्धव ठाकरे हे 9 जुलैपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यवतमाळ येथे जाऊन उद्धव ठाकरे पोहरा देवीचे दर्शन घेणार आहेत. यवतमाळ, अमरावती आणि नागपूर असा दोन दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. 13 आणि 14 जुलै हिंगोली आणि परभणीचा दौरा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मनसे शिवसेना एकत्र येण्याचे बॅनर्स लागलेत. पण अशी चर्चा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us