Rajya Sabha Election: आजच बॅगा भरून मुंबईत या, शिवसेना, काँग्रेसचं आमदारांना फर्मान, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी

| Updated on: Jun 06, 2022 | 12:43 PM

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने सहावा उमेदवार दिला आहे. पण भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दोन्ही पक्षांची सर्व मदार अपक्ष आमदारांवर आहे.

Rajya Sabha Election: आजच बॅगा भरून मुंबईत या, शिवसेना, काँग्रेसचं आमदारांना फर्मान, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
आजच बॅगा भरून मुंबईत या, शिवसेना, काँग्रेसचं आमदारांना फर्मान, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) फक्त चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे आमदार फूटू नयेत म्हणून शिवसेनेने (shivsena) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना आजच मुंबईत बॅगा भरून येण्यास सांगितलं आहे. चार पाच दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन या, असे आदेशच मुख्यमंत्र्यांकडून या आमदारांना दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, अमिषांना बळी पडून हे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेही आपल्या आमदारांना बॅगा घेऊन मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व आमदारांची एका बड्या हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली जाणार असून त्यांना कुणालाही संपर्क करू दिला जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, राष्ट्रवादीकडूनही आमदारांना काही सूचना दिल्या जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने सहावा उमेदवार दिला आहे. पण भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दोन्ही पक्षांची सर्व मदार अपक्ष आमदारांवर आहे. पण अपक्ष आमदार कुणाच्याही बंधनात नसल्याने त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. आजच बॅगा भरून मुंबईत या, असं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांना आणि अपक्ष आमदारांना सांगितल्याचं सांगितलं जातं. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. म्हणून या आमदारांना मुंबईत बोलावलं असून त्यांना आजच हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचेही फर्मान

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही त्यांच्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत सहज निवडून येणार आहे. पण तरीही काँग्रेसनेही गाफील न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच काँग्रेसनेही आपल्या आमदारांना बॅगा घेऊनच चार पाच दिवसांसाठी मुंबईत येण्याचे फर्मान सोडल्याचं समजतं.

मुख्यमंत्री मन वळवणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संध्याकाळी बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्वत: या आमदारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आमदारांच्या समस्याही ते जाणून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.