आधी ‘वर्षा’वर, नंतर ‘मातोश्री’वर, नाराज खोतकर आज मुंबईत!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी अद्यापही दूर झाली नाही. अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी आज राजधानी मुंबईत प्रयत्न होताना दिसणार आहेत. मात्र, या प्रयत्नांचा क्रम काहीसा चक्रावणारा आहे. कारण अर्जुन खोतकर हे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर जाणार आहेत, त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या […]

आधी वर्षावर, नंतर मातोश्रीवर, नाराज खोतकर आज मुंबईत!
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी अद्यापही दूर झाली नाही. अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्यासाठी आज राजधानी मुंबईत प्रयत्न होताना दिसणार आहेत. मात्र, या प्रयत्नांचा क्रम काहीसा चक्रावणारा आहे. कारण अर्जुन खोतकर हे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर जाणार आहेत, त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जातील.

अर्जुन खोतकर आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जातील. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर नाराज अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवायची की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.

VIDEO : खोतकर-दानवे वादाचा लाईव्ह व्हिडीओ

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी दंड थोपटले आहेत. काल त्यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतरही अर्जुन खोतकरांची नाराजी कायम आहे.  मी अजूनही मैदानातच असून, निवडणुकीचं रणांगण सोडलं नाही, अशी अर्जुन खोतकर यांची भूमिका आहे.

काल शिष्टमंडळाच्या भेटीत काय झालं?

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन सहकारमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख हे रावसाहेब दानवेंना घेऊन जालन्यात अर्जुन खोतकरांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी खोतकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर सुभाष देशमखांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,”अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांची एकत्रित बैठक घेण्यास मला पक्षाने सांगितलं होतं. त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली. खूप सकारात्मक चर्चा झाली. पुढच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हातात हात मिळवून, लोकसभा आणि विधानसभा ताकदीने लढून, जास्तीत जास्त उमेदवार जिंकण्याचं दोघांनीही ठरवलं आहे.”

अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे नेते आहेत. मात्र शिवसेनेकडून कमी आणि भाजपकडूनच अधिक धडपड होताना दिसते आहे. अर्थात, याचे कारण असे की, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या रुपाने भाजपचा खासदार आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्यासारख्या जालन्यातील ताकदवाने नेत्याने बंडखोरी केल्यास भाजपला चांगलाच दणका बसेल. किंबहुना, दानवेंचा विजय मुश्किल होऊन बसेल. त्यामुळे खोतकरांची समजूत काढण्यासाठी थेट राज्याच्या प्रमुखांनी म्हणेच मुख्यमंत्र्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्सासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. नुसती चाचपणीच नव्हे, तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर यांनाच उमेदवारी देण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, खोतकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गेल्या काही दिवसात दोनदा भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत आहेत. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नाहीत. दानवेंविरोधात लढण्यासाठी त्यांना शड्डू ठोकला आहे.