पत्रीपुलाचं श्रेय घेता आलं नाही, त्यामुळे पत्रीपूल-ठाकुर्ली रस्त्यासाठी आंदोलन, शिवसेनेची मनसे आमदारावर खरमरीत टीका

| Updated on: Nov 24, 2020 | 3:13 PM

तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे आंदोलन करण्याची गरज नव्हती, असा टोला शिवसेनेने लगावला आहे (Shiv Sena leader slams MNS MLA Raju Patil).

पत्रीपुलाचं श्रेय घेता आलं नाही, त्यामुळे पत्रीपूल-ठाकुर्ली रस्त्यासाठी आंदोलन, शिवसेनेची मनसे आमदारावर खरमरीत टीका
Follow us on

ठाणे : कल्याण पूर्वेतील ठाकुर्ली ते पत्रीपूल 90 फूट रस्त्याच्या रखडलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे हा रस्ता रखडल्याचा आरोप करत मनसे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडल्याचे सांगत या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज नव्हती, असे प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले आहे (Shiv Sena leader slams MNS MLA Raju Patil).

कल्याण पूर्वेत ठाकुर्ली ते पत्रीपूल 90 फूटी रस्ता जवळपास तयार झाला आहे. केवळ 100 मीटर रस्त्याचे काम रखडल्याने वाद निर्माण झाला होता. या रस्त्यासाठी बाधित नागरीकांचे घरे तोडले गेले. मात्र, खुली जागा महापालिका का संपादीत करत नाही? असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी रस्ता बाधितांसोबत आयुक्त विजय सूर्यवंशी यांची काल (23 नोव्हेंबर) भेट घेतली.

रस्ता बाधितांना मोबदला मिळावा. रस्त्याचे काम सुरु व्हावे, अशी मागणी मनसे आमदारांनी केली. इतकेच नाही तर शिवसेनेच्या एका माजी महापौरांमुळे हा रस्ता रखडल्याची टीका राजू पाटील यांनी केली होती. त्यानंतर रखडलेल्या 100 मीटर 90 फूटी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे (Shiv Sena leader slams MNS MLA Raju Patil).

“काही तांत्रिक अडचणींमुळे या रस्त्याचे काम थांबले होते. मी या रखडलेल्या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. तत्कालीन आयुक्त, महापौर, महापालिकेचे अधिकारी, जागा मालक यांच्यात चर्चा घडवून आणली. अखेर माझ्या पाठपुरावाला यश आलं आहे. नागरिकांसाठी एक चांगला रस्ता तयार होणार आहे आहे. रस्त्याचे काम होणारच होते. यासाठी आंदोलनाची गरज नव्हती. पत्री पूलाचे श्रेय घेता आले नाही. त्यामुळे या रस्त्यासाठी आंदोलन केले”, अशी प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी आणि परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनीही या रस्त्यासाठी महासभेत प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्याच्या कामाची सुरुवात झाल्याने त्यांनी सर्वाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातमी : ‘असंच काम करा, आम्हाला बोलावं लागणार नाही’, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला