‘प्यार किया तो डरना क्या?’, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला!

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'प्यार किया तो डरना क्या?', असं म्हणत धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.

प्यार किया तो डरना क्या?, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला!
| Updated on: Jan 13, 2021 | 8:02 PM

जालना :  बलात्काराच्या आरोपांनी अडचणीत सापडलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, असं म्हणत धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. (Shivsena Abdul Sattar on Dhananjay Munde pyaar kiya to Darana Kya)

एकीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया येत आहेत. असं असताना एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

“धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना सत्तार म्हणाले, “भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात विविध प्रकारची माहिती लपवली आहे. त्या नेत्यांची नावे मी वेळ आल्यास जाहीर करीन”.

विरोधकांनी पहिलं आपलं तोंड आरशात पाहावं

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, असा घणाघाती हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे.

सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून विरोधकांचे वाभाडे काढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागमी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतात तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असाताना पाळली होती का? विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.