अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर…, सामनातून टीकेचे बाण

| Updated on: Feb 09, 2021 | 6:41 AM

तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात!, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) गृहमंत्री अमित शाहा यांच्या कोकणातील सभेवर निशाणा साधण्यात आलाय.

अमित शाहांच्या पायगुणात इतकीच ताकद असती तर..., सामनातून टीकेचे बाण
Sanjay raut And Amit Shaha
Follow us on

मुंबई : स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले आहे. त्यांना शुभेच्छा व मानसिक शांततेसाठी प्रार्थनेचे बळ देण्याशिवाय दुसरे काय करू शकतो? महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांची नियुक्ती रोखली म्हणजे सरकारचा प्राण तडफडेल असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. या सर्व प्रकारात तुमचेच वस्त्रहरण झाले आहे . कोकणातही धुरळा उडविताना तेच घडले. तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात!, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) गृहमंत्री अमित शाहा (Amit Shaha) यांच्या कोकणातील सभेवर निशाणा साधण्यात आलाय. (Shivsena Attacked Bjp And Amit Shaha Through Saamana Editorial Over Konkan Ralley)

अमित शाहांनी तोच कोळसा उगाळून काय साधले?,

“देशातील सर्व प्रश्नांचा निचरा झाल्यामुळे गृहमंत्री श्री. अमितभाई शहा हे रविवारी कोकण प्रांतात पायधूळ झाडून गेले. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र भाजपातील एकजात सर्व मूळ पुरुष तसेच बाटगे मंडळ उपस्थित होते. अमितभाई हे बऱ्याच कालखंडानंतर महाराष्ट्रात अवतरल्याने ते काय बोलतात, काय करतात याकडे लोकांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे अमित शहा यांनी धुरळा उडवला, पण त्यांचे विमान पुन्हा दिल्लीत उतरण्याआधीच धुरळा खाली बसला आहे. श्री. शहा नवीन असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी तोच कोळसा उगाळून काय साधले?”

अमित शाहांच्या गजाली महाराष्ट्राने गांभीर्याने घेतल्या नाही

“अमित शाहांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघाताने आले आहे, सरकार तीनचाकी आहे वगैरे वगैरे. बंद खोलीत आपण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. दुसरे म्हणजे आपण जे करतो ते ‘डंके की चोट’पर करतो. बंद खोलीत कधीच काही करत नाही अशा गजाली त्यांनी कोकणात येऊन केल्या. त्यामुळे कुणाचे मनोरंजन झाले असेल तर माहित नाही, पण महाराष्ट्राने या गजाली गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.”

महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य!

“बरे, बंद खोलीचे रहस्य याआधी भाजप पुढाऱ्यांनी अनेकदा मांडले आहे. अनेक ‘बैठ्या’ मुलाखतीत श्री. शहा यांनी स्पष्ट केले आहे की, ”बंद खोलीत काय घडले हे बाहेर सांगणे हा आपला संस्कार नाही.” मग आता कोकणच्या ‘जगबुडी’ नदीत त्या संस्काराचे विसर्जन का झाले? हे सर्व लोक या पद्धतीने ‘उचकले’ आहेत याचे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याचे वैफल्य! भाजपच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे. ज्या वैद्यकीय कॉलेजचे उद्घाटन काल झाले, त्यात या आजारावर उपचार होतात काय ते पाहावे लागेल, पण महाराष्ट्रातून सत्ता उलथवून टाकल्याचा बाण काळजात घुसला आहे. त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे.”

….त्यांच्या पायगुणात इकतीच ताकद असती तर?

“अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकले नाही. अमित शहा यांच्यात व शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसे नसते तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती. आम्ही लपूनछपून काळोखात काही करत नाही, असे कोकणात सांगितले गेले. त्यावर कोकणातली भुतेही हसून नाचली असतील.”

त्याबद्दल अमित शहा यांचे आभार…!

“केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोकणातील धुरळ्यात आणखी एक उडवाउडवी केली. आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. उलट शिवसेना तुमच्या वाटेने जात राहिली असती तर आजचा सुवर्ण कळस कधीच दिसला नसता. परमेश्वराची कृपा म्हणून भाजपला शब्द फिरविण्याची दुर्बुद्धी सुचली व शिवसेनेस हे ‘अच्छे दिन’ दिसले. त्याबद्दल महाराष्ट्राची जनता अमित शहा यांची सदैव ऋणी राहील…”

पंचवीस वर्षे युतीत सडली असे उद्धव ठाकरे म्हणाले ते सत्य…

पंचवीस वर्षे युतीत सडली असे उद्धव ठाकरे म्हणाले ते सत्य होते. यावर शिवसेनेच्या सद्यस्थितीने शिक्कामोर्तबच केले. शिवसेनेने आपला मार्ग निवडला तसा अकाली दलानेही निवडला. हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अस्तित्वाचे खांब होते. अनेक वादळांत या खांबांनी भाजपचा डोलारा व प्रतिष्ठा टिकवून ठेवली होती. एकामागून एक असे जुने साथी आपल्याला का सोडून गेले यावर भाजप नेतृत्वाने विचारांचा धुरळा उडवला तर बरे होईल, असा सल्लाही सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देण्यात आला आहे.

(Shivsena Attacked Bjp And Amit Shaha Through Saamana Editorial Over Konkan Ralley)

हे ही वाचा :

‘पंतप्रधान आम्हाला घाबरतात, त्यांना हे शोभत नाही’, ‘आंदोलनजीवी’वरुन योगेंद्र यादवांचा घणाघात

शाहनवाज हुसैन दिल्लीतून थेट पाटण्यात, उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार? काय आहे भाजपची खेळी?