…तर आमदारकीचाही राजीनामा देईन : तानाजी सावंत

| Updated on: Feb 07, 2020 | 12:54 PM

पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला, तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला

...तर आमदारकीचाही राजीनामा देईन : तानाजी सावंत
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षाने माझ्या आमदारकीचा, पदाचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन, पण पद सोडताना माझी एकच अट असेल, माझ्या भागाला 21 टीएमसी पाणी द्या, असं वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant on Marathwada Water Issue) यांनी केलं. शिवसेनेबाबत असलेल्या नाराजीवर तानाजी सावंत यांनी पडदा टाकला असला, तरी महाविकास आघाडी सरकारवर तानाजी सावंतांनी टीका केली.

पाण्याच्या बाबतीत त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मराठवाडा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. गेली 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला. आमच्या शासनाने (फडणवीस सरकार) जी वॉटरग्रीड सिस्टम मंजूर केली होती, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याने स्थगिती देण्याचं कारस्थान केलं, असा आरोप तानाजी सावंत यांनी केला.

पाण्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यावर अन्याय केला, तर तो हाणून पाडेन. मग कुठला पक्ष याचा मुलाहिजा बाळगणार नाही, असा इशाराही तानाजी सावंत यांनी दिला. कुठल्या पक्षाची मराठवाड्याप्रती काय भूमिका आहे, हे दोन-चार महिन्यात स्पष्ट होईल, असंही तानाजी सावंत म्हणाले.

जो या जिल्ह्याच्या विरोधात तो आपला विरोधक. मंत्रिपदाचं कवच गेलं, पण आमदार तोच आहे. आपल्याला मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे विकास होईल का, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण विकासाच्या आड कोणी आलं, तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी तानाजी सावंत मागे वळून पाहणार नाही, असंही तानाजी सावंतांनी निक्षून सांगितलं.

महिना-दोन महिने तुमच्या हाती अधिकार आले, म्हणून हुरळून जाऊ नका. कधी पहाटे पाच वाजता अधिकार निघून जाईल, सांगता येणार नाही, असा टोलाही सावंतांनी लगावला. केंद्राच्या मदतीशिवाय एकही प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचंही त्यांनी बोलून (Tanaji Sawant on Marathwada Water Issue) दाखवलं.