तुमचे तीनच वर्षे उरलेत, ज्या तख्तावर तुम्ही बसलात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील : गुलाबराव पाटील

| Updated on: Dec 06, 2020 | 2:55 PM

ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

तुमचे तीनच वर्षे उरलेत, ज्या तख्तावर तुम्ही बसलात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील : गुलाबराव पाटील
Follow us on

जळगाव : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनाचा आज 11 वा दिवस आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक नसल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Shivsena Gulabrao patil Slam bjp over Delhi Farmer protest)

“शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमचे तीनच वर्षे उरले आहेत. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील”, असा असा इशारा गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारला दिला. आज (रविवार)  जळगावात दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधलं.

“शेतकरी या देशाचा कणा आहे. जर शेतकरी जगला तरच हा देश जगेल. भारत देश केवळ कृषीप्रधान आहे असं म्हणून चालणार नाही तर त्यासाठी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागतील. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी राजाने दिल्लीतल्या सीमेवर ऐन थंडीत तळ ठोकलाय. मात्र सरकार त्यांच्या भावना समजून घेत नाही हे निराशाजनक आहे”, असं पाटील म्हणाले.

दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील संघटना देखील राजधानी दिल्लीत पोहोचल्या आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू दुचाकींच्या काबिल्यासह दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सरकारशी दोन हात करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही बळीराजासोबत असू, असा इरादा बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे या देखील दिल्लीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचल्या आहेत. आज त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला. अन्नदात्यालाच न्याय-मागण्यांसाठी आज आंदोलन करावं लागतंय ही भारतातली मोठी शोकांतिका आहे. आम्ही बळीराजाची मुलं मागे हटणार नाही. सरकारविरोधात आम्ही लढू आणि जिंकू असा विश्वास यावेळी पूजा मोरे यांनी व्यक्त केला.

(Shivsena Gulabrao patil Slam bjp over Delhi Farmer protest)

संबंधित बातम्या :

‘एनडीए’बाहेर पडलेल्या दोन पक्षांची भेट, अकाली दलाचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार