‘खासदाराला साधा अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं’, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

| Updated on: Oct 24, 2021 | 5:04 PM

एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी केलाय.

खासदाराला साधा अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला
रक्षा खडसे, गुलाबराव पाटील
Follow us on

जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसे यांना जोरदार टोला लगावलाय. खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. (Shivsena Leader Gulabrao Patil criticizes BJP MP Raksha Khadse)

एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी केलाय.

रक्षा खडसे-स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद

धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.

एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता.

महाजनांची फसवणूक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर राजकारणाचा नवा अंक पाहायला मिळतोय. जळगाव भाजपच्या खासदार रक्षा खडसे व भाजपचे माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले, असा आरोप जिल्हा बँक निवडणूक अर्जावरून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केलाय. निवडणूक प्रक्रियेविरुद्ध बोलण्याऐवजी गिरीश महाजन यांनी आरोप करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे, असा टोला सतीश पाटील यांनी केलाय.

सतीश पाटील नेमकं काय म्हणाले?

भाजप खासदार रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी गिरीश महाजन यांना फसवलंय. दोघींनी जाणीवपूर्वक अर्ज अपूर्ण ठेवल्यानं त्यांचे अर्ज बाद झाले. रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांना भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवायची असेल त्यामुळे त्यांनी महाजन यांच्या आदेशानं अर्ज दाखल केले असतील, असं सतीश पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, व्हॉट्सअ‌पवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप, मुंबईत विद्यार्थ्यांचा ठिय्या

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणुकीत शरद पवार मोठ्या फरकानं विजयी, अध्यक्षस्थानी विराजमान होणार

Shivsena Leader Gulabrao Patil criticizes BJP MP Raksha Khadse