उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ

| Updated on: May 25, 2021 | 9:44 AM

रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. (Uday Samant Devendra Fadnavis Nilesh Rane)

उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ
उदय सामंत, देवेंद्र फडणवीस
Follow us on

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Shivsena Leader Uday Samant allegedly meets Devendra Fadnavis in Ratnagiri claims Nilesh Rane)

फडणवीसांच्या कोकण दौऱ्यात भेट?

“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

मंत्र्याची भाजप नेत्याशी गुप्त भेट का?

तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

फडणवीसांचा कोकण दौरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा केला. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला होता. “मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?” असा सवाल करतानाच “गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत” अशी टीका फडणवीस यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?; फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ ठाकरेही कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला

(Shivsena Leader Uday Samant allegedly meets Devendra Fadnavis in Ratnagiri claims Nilesh Rane)