WTC 2027: बांगलादेशच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आकडे झपाट्याने बदलले, भारताचं टेन्शन वाढलं
कसोटी क्रिकेटमध्ये दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेश संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक नोंद केली आहे. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. तसेच भारताचं टेन्शन वाढलं आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने मोठा उलटफेर करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. या विजयामुळे मालिका आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणतालिकेतील समीकरण बदललं आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने आता ती वाचवण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियापुढे आहे. कारण पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे, तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत जागा मिळवण्याचं समीकरण झपाट्याने बदललं आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यामुळे भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचे गणित अधिक रंजक आणि आव्हानात्मक झालं आहे. इतकंच काय तर बांगलादेशही अंतिम फेरीसाठी दावेदार ठरला आहे. त्यासाठी बांगलादेशचं गणित सोपं असणार आहे.
बांग्लादेश संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार?
बांग्लादेश संघाने 2025-2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवला आहे. त्यामुळे बांगलादेशची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून चौथ्या स्थानावर आहे. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला उर्वरित 7 सामन्यांपैकी किमान 4 सामने जिंकणे आवश्यक आहे.पाच सामन्यात विजय मिळवला तर विजयी टक्केवारी 61.11 च्या आसपास राहील आणि टॉप 2 मध्ये स्थान मिळेल. बांगलादेशने 3 विजय आणि दोन सामने अनिर्णितराखले, तर विजयी टक्केवारी 57.40 टक्के होईल. अशा स्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. भारत, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असेल.
A look at the current #WTC27 standings after Bangladesh’s stellar victory against Australia 👀
📝: https://t.co/TJt9cbipMe pic.twitter.com/STlrZu6ZUy
— ICC (@ICC) August 16, 2026
भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ पाचव्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 48.15 आहे. त्यामुळे भारताला 9 पैकी किमान 7 सामने जिंकणं भाग आहे. तसेच एक सामना बरोबरीत सोडवावं लागणार आहे. असे केल्यास भारत 65 टक्क्यांची विजयी टक्केवारी सोडवू शकेल. भारताची श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-0 असा विजय मिळवणे भाग आहे. न्यूझीलंडमधील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला चांगली कामगिरी करून दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला 4-1 किंवा 3-1 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.
