वाडिया रुग्णालयासाठी आंदोलन, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती, सेना आमदाराने लक्ष वेधलं

| Updated on: Jan 13, 2020 | 12:16 PM

अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने (Shivsena mla with sharmila thackeray wadia hospital protest) दिली.

वाडिया रुग्णालयासाठी आंदोलन, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती, सेना आमदाराने लक्ष वेधलं
Follow us on

मुंबई : अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने (Shivsena mla with sharmila thackeray wadia hospital protest) दिली. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (13 जानेवारी) लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरीही यांचीही (Shivsena mla with sharmila thackeray wadia hospital protest) उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

शिवसेना आमदार अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. तर वाडिया रुग्णालय हे त्यांच्या मतदारसंघात परळ येथे आहे.

वाडियातील कर्माचाऱ्यांच्या आंदोलनात शर्मिला ठाकरेंसोबत आमदार अजय चौधरीही सहभागी झाल्याने मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांसह वाडिया रुग्णालयातील कामगार उपस्थित होते.

लाल बावटा कामगार संघटनेकडून प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वात वाडिया रुग्णालयाबाहेर तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया रुग्णालयासाठी दिला जाणारा निधी अनेक वर्षांपासून थकित आहे. त्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार ढबघाईस आला आहे. याचा फटका रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णांना बसत आहे. त्यामुळे रुग्णालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

“वाडिया रुग्णालयाला 90 वर्षांची परंपरा आहे. 830 बेडच्या या रुग्णालयात 525 बाल रुग्णालयातील बेड, तर 305 प्रसुती रुग्णालयातील बेड आहेत. बाई जेरबाई वाडिया बाल रूग्णालयाला महापालिकेचे अनुदान तर, नौरोसजी वाडियाला पालिका आणि राज्य सरकार अनुदान देते. गेल्या दीड वर्षांपासून हे अनुदान थकित आहे. जवळपास 229 कोटी निधी राज्यशासनाकडून आणि महापालिकेकडून थकित आहे. रुग्णालयात औषधांचा साठाही संपला आहे. निधी नसल्याने रुग्णसेवा पुरवणे कठीण झालं आहे. त्यामुळे 50% बेड सध्या कमी केले आहेत. केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. हे रुग्णालय चांगलं आहे, सरकारने याला अनुदान दिलं पाहिजे, अशी मागणी आता रुग्णाच्या नातेवाईक करत आहेत”, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शकुंतला प्रभु यांनी दिली.