महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती? बैठकीनंतर शिवसेना आमदारांची पंचतारांकित हॉटेलात रवानगी : सूत्र

| Updated on: Nov 07, 2019 | 7:22 AM

शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (ShivSena Mla in trident hotel) आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकची पुनरावृत्ती? बैठकीनंतर शिवसेना आमदारांची पंचतारांकित हॉटेलात रवानगी : सूत्र
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत (ShivSena Mla in trident hotel) आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (7 नोव्हेंबर) शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. यावेळी शिवसेनेकडून कोणा बरोबर जावं याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (ShivSena Mla in trident hotel) आहे.

सध्या राज्यात शिवसेना भाजपमध्ये सत्तास्थापनेचा संघर्ष सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली असून भाजपसोबत जायचं की नाही याबाबतचा निर्णय उद्याच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीनंतर आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी सर्व आमदारांना एकत्रित एका हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. पुढील काही दिवस हे सर्व आमदार एकत्रित राहतील. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आले होते. हीच रणनिती शिवसेनेकडून वापरली जात आहे. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये. त्यासाठी त्यांना एकत्रित ठेवण्याची रणनिती आखली जात असल्याचे बोललं जातं आहे.

यातून शिवसेनेला कुठेतरी आमदार फुटण्याची भिती असल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांना इतर पक्षांकडून त्यांना ऑफर येऊ शकते. यासाठी ही सर्व रणनिती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली (ShivSena Mla in trident hotel) आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपला पाठिंबा देलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसेनेने हे पाऊल उचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

उद्या भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यापूर्वी शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव आला नाही. तर भाजप सत्तास्थापनेचा दावा करायचा का याबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान आज रात्रभर राज्यातील सत्तास्थापनेच्या अनेक घडामोडी घडू शकतात. कर्नाटक सत्तास्थापनेप्रमाणे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होताना दिसत आहे. त्यात शिवसेना महत्त्वाचा केंद्रबिंदू बनली आहे. आपला कोणताही आमदार भाजपच्या बाजूने जाऊ नये यासाठी शिवसेनेने पूर्ण मोर्चेबांधणी केली आहे.

सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.