एकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच : संजय राऊत

| Updated on: Feb 21, 2020 | 11:00 AM

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांचाही एकमेकांशी चांगला संवाद आहे. कुठल्याही विषयावर मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही.' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

एकट्या भाजपमध्येही मतभेद, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद साहजिकच : संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली : एकट्या भाजप सरकारमध्येही मतभेद होते, मग तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असणं साहजिक आहे. परंतु सरकारला त्याचा कोणताही त्रास किंवा अडचण नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on three party alliance)

‘महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणाचेही कोणाशीही मतभेद नाहीत. हे तीन पक्षाचं सरकार आहे. तीन पक्ष अतिशय उत्तम काम करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या तिघांचाही एकमेकांशी चांगला संवाद आहे. कुठल्याही विषयावर मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही.’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

‘मुख्यमंत्री उद्घव ठाकरे सरकारचं नेतृत्व करत आहेत. एनपीआरबाबत तीन पक्षांमध्ये वेगळी भूमिका असली, तरी मतभेदाचा सरकारला त्रास नाही. एका पक्षाचं सरकार असलं, तरी मतभेद असतात. भाजप सरकारमध्येही विरोधाचा सूर उमटत होता. हे तर तीन पक्षाचं सरकार आहे. परंतु भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी काही अडचण नाही.’ असा दावा संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद राजधानी दिल्लीत संवाद साधला.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांची भेट घेणार, सोनिया गांधींसोबतही चर्चा

‘अयोध्येत जर राम मंदिर बांधलं जात आहे, तर राम जन्मभूमीसाठी झालेल्या संघर्ष आणि आंदोलनात जे शहीद झाले, त्यांचं स्मारक व्हावं अशी सूचना आम्ही केली. गोळीबारानंतर लाल झालेली शरयू नदी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली आहे. बरेचसे शहीद अज्ञात आहेत, मात्र ज्यांची नावं उपलब्ध आहेत, ती कोरली जावीत. न्यायालयाच्या आदेशाने केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन केला आहे, निर्णय ते घेतील.’ असं राऊत म्हणाले.

‘उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये जी चर्चा होते, ती राज्याच्या विकासाबाबत होते, योजना, रखडलेल्या कामांविषयी होते. तशी चर्चा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये होणार आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न, विकासकामं, पायाभूत सुविधा असे अनेक विषय आहेत. राजकीय मार्ग जरी बदलले असले, तरी नातेसंबंध महाराष्ट्र टिकवत आला आहे’, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी-उद्धव भेटीवर भाष्य केलं.

‘सोनिया गांधींशी उद्धव ठाकरेंचे संबंध चांगलेच आहेत. याआधी आदित्य ठाकरेही भेटून गेले आहेत. त्यामुळे संबंध सुधारण्याचा प्रश्नच नाही. लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक राहिले आहेत. शिवसेनेबाबत त्यांची भूमिका कायमच प्रेमाची आणि आस्थेची राहिली आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी कायमच आशीर्वाद दिला आहे.’ असंही राऊत (Sanjay Raut on three party alliance) म्हणाले.

एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी 15 कोटी मुस्लिम 100 कोटी जनतेला भारी पडतील, अशी दर्पोक्ती केल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचाही समाचार घेतला. ‘कोण वारिस पठाण? त्यांना विनाकारण महत्त्व दिलं जात आहे. 15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 लोकं येऊ द्या, त्यांचा मी सत्कार करेन’ असा टोलाही राऊतांनी हाणला.

पाहा व्हिडीओ :