Sanjay Raut | धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहिल, शिवसेना कुठेही गेली नाही, संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं!

| Updated on: Jul 08, 2022 | 12:55 PM

पक्षातील दोन तृतीयांश संख्याबळ एकनाथ शिंदे गटाकडे असल्यामुळे कायद्यानुसार, पक्षाचं चिन्ह शिंदेगटाला मिळणार, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

Sanjay Raut | धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहिल, शिवसेना कुठेही गेली नाही, संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं!
संजय राऊत
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबईः शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मिळेल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांनी मात्र पुन्हा एकदा यावर ठणकावून सांगितलं आहे. धनुष्यबाण (Dhanushyaban) शिवसेनेकडेच राहिल. शिवसेना पक्षाला काहीही होणार नाही, काही जण सोडून गेलेत, मात्र इतर ठिकाणची शिवसेना, नगरसेवक, पदाधिकारी आहेत तिथेच आहेत. सध्या उठलेली ही काही दिवसांचीच वावटळ आहे. ती निघून जाईल, असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. शिवसेनेचं पक्ष संघटन वाढवण्याच्या उद्देशाने संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्या शिवसैनिकांचा मोठा मेळावा येथे आयोजित करण्यात आला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना पक्षाला नवे चिन्ह मिळणार, यासाठी मनाची तयारी ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील दोन तृतीयांश संख्याबळ एकनाथ शिंदे गटाकडे असल्यामुळे कायद्यानुसार, पक्षाचं चिन्ह शिंदेगटाला मिळणार, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ धनुष्यबाण शिवसेनेकडेच आहे. कुठेही जाणार नाही. भाजपने माझ्यासोबत बोलणं थांबवलंय. त्यांना ४० भोंगे मिळालेत. त्यांच्याच माध्यमातून ते बोलतायत. आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. आग्रहानं उमेदवाऱ्या दिल्या आहेत. आमच्या जोरावर ते निवडून आले. आता तिकडे गेले. मात्र पुन्हा निवडून येणार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

नाशिकमध्ये शिवसेना मबजूत!

ठाणे, पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली पालिकेतील बहुतांश नगरसेवक एकदाथ शिंदे यांच्या गटात शामिल झाल्याच्या बातम्या येत आहेत. ठाणे महापालिकेत तर शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांपैकी फक्त एकच नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिलाय. मात्र नाशिक महापालिकेत ही स्थिती नाही. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या संपर्कात असून शहरातील शिवसेनाही जागेवरच आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊत यांनी नाशिकच्या ग्रामीण भागात दौरे केले असून उद्या शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 ‘ग्रामीण भागातही हेच चित्र’

नाशिक जिल्ह्याविषय़ी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘  मालेगाव, नांदगाव मतदार संघातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी भेटून गेले. उद्या भेटत आहेत. ते शिवसेनेशी जोडले जात आहेत. नाशिक हे नेहमीच राजकीय दृष्ट्या एक चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेलं आहे. नाशिक हा जिल्हा , शहर, महापालिका सदैव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. इतर ठिकाणच्या बातम्या सुरु आहेत. पण नाशिकचे सर्व पदाधिकारी शिवसेनेसोबत आहे. निवडणुका झाल्यातरी शिवसेनेची सत्ताच येईल. ग्रामीण जिल्ह्यात काही बदल होतील. ते लवकरच जाहीर होतील.’