‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!’ अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन होणाऱ्या टीकेला राऊतांचं ‘रोखठोक’ उत्तर

| Updated on: Nov 08, 2020 | 8:16 AM

अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपवर हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला असल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर करण्यात आला. भाजपच्या या आरोपाला शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले! अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन होणाऱ्या टीकेला राऊतांचं रोखठोक उत्तर
Follow us on

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याची टीका भाजपसह अनेक विरोधकांनी राज्य सरकारवर केली. अनेक वृत्तपत्रसंस्थांकडूनही अर्णव गोस्वामी यांना झालेली अटक योग्य नसल्याचं बोललं जात आहे. यावर सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (After the arrest of Arnav Goswami, Sanjay Raut strongly criticized the BJP)

“अर्णव गोस्वामी या वृत्तवाहिनीच्या मालकास पोलिसांनी ‘आत्महत्या’ प्रकरणात पकडताच अनेकांना चौथ्या स्तंभावर हल्ला झाल्याची उबळ आली. रिया चक्रवर्तीच्या अटकेसाठी ज्यांनी मोहीम राबवली त्यांना त्यात गुन्ह्यात अटक झाली. तेव्हा तो वृत्तपत्र स्वातंत्यावर हल्ला कसा करु शकतो? वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले आहे!” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रोखठोकमधून भाजपवर जोरदार हल्लाबोल

‘पत्रकारांना काडीचीही किंमत न देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या सूज्ञ जनतेने तसा पराभव केलाच आहे. (पण ट्रम्प हार मानायला तयार नाहीत.) टॅम्प हे कसेही असले तरी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदा घेत होते आणि पत्रकारांनाच ‘ज्ञान’ देत होते. ट्रम्प यांची अमेरिकेतून गच्छंती प्रक्रिया सुरु असतानाच अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष भाजप रस्त्यावर उतरला. गोस्वामी यांची अटक म्हणजे देशाच्या चौथ्या स्तंभावर म्हणजे मीडियावर हल्ला असे सांगण्यात आले. गोस्वामी यांनी गुन्हा केला आहे. त्यांनी मुंबईतील एका मराठी उद्योजकाचे पैसे बुडवले. त्या तणावातून अन्वय नाईक व त्याच्या वृद्ध आईने आत्महत्या केली. नाईक यांच्या मृत्यूस गोस्वामी जबाबदार आहेत. अशी सुसाईट नोट मृत्यूपूर्वी लिहून ठेवली. हा पुरावा असताना आधीच्या भाजप सरकारने या सर्व प्रकरणाचा गळाच दाबला. त्या दडपलेल्या गुन्ह्याची पुन्हा चौकशी करणे हा काय अपराध झाला? पोलिसांनी गोस्वामी यांना अटक केली हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्ला कसा होऊ शकेल? पंतप्रधान मोदी वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अर्णव गोस्वामींच्या बाजूने उभे राहिले व मृत अन्वय नाईक, त्यांची पत्नी, मुलगी यांचा आवाज दडपण्यात आला हे प्रकरण निर्भयापेक्षा, हाथरसपेक्षाही भयंकर आहे.’ अशा शब्दात राऊत यांनी भाजप नेत्यांवर आपल्या रोखठोक सदरातून भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘त्यांची’ शाळा घेण्याचा सल्ला, शिवसैनिकांनी केलेल्या हल्लाचीही आठवण!

“अभिव्यक्ती स्वातंऱ्यावर, चौथ्या स्तंभावर हल्ला म्हणजे नक्की काय? ते ‘गोस्वामी झिंदाबाद’चे नारे देणाऱ्यांना ‘पाठशाला’ घेऊन समजून सांगायला हवे. आणीबाणीची आठवण या निमित्ताने काढली. आणीबाणीत वृ्त्तपत्र स्वातंत्र्याचे हवन झाले हे सत्य आणि त्याचा फटका बाळासाहेब ठाकरे यांना बसला. महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य हेते आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे संपादक असलेल्या मार्मिक प्रेसलाच ठाळे ठोकले. ही दडपशाहीच होती. त्या दडपशाहीला झुगारुन आणीबाणीत मार्मिक प्रसिद्ध होत होता. वर्ध्याच्या पवनार आश्रमात विनोबांच्या छापखान्यावर तेव्हा धाडी पडल्या. इंदिरा गांधींना आव्हान देणाऱ्या रामनाथ गोयंकांच्या इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहांवर धाडी पडल्या. संपादकांवर दबाव आले. दोनशेपेक्षा जास्त खटले रामनाथ गोयंकांवर दाखल झाले. हा माझ्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होता. महानगरचे तत्कानील संपादक हे शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांविरोधात खालच्या पातळीवर टीका करीत तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्यावर दोन वेळा हल्ला केला व वागळे यांच्या समर्थनार्थ देशभरातील पत्रकार शिवसेना भवनासमोर एकवटले होते. लोकसत्ताचे माजी संपादक असताना कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला झाला. हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचाच हल्ला होता. अर्णव गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजप उतरला, पण पत्रकार लांब आहेत. कारण गोस्वामी यांच्या पत्रकारितेने संपूर्ण क्षेत्रालाच बदनाम आणि कलंकित केल्याची भावना आहे.”

काही वृत्तपत्र, माध्यम संस्थांवर सरकारचे शागीर्द असल्याचा आरोप

“भारतीय राज्यघटनेचे 19वे कलम प्रत्येक भारतीयाला मताचा आणि मतप्रसाराचा अधिकार देते. आता बरेचसे पत्रकार, संपादक व वृत्तवाहिन्या या सरकारच्या शागीर्द झाल्या आहेत. ज्यांनी ही शागिर्दी पत्करण्यास नकार दिला त्या सर्व वरिष्ठ पत्रकारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या व एनडीटीव्हीसारख्या वृत्तवाहिन्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या. सरकारच्या विरोधकांवर जे उकिरड्यावरील कुत्र्यांसारखे भुंकत राहिले त्यांचे सर्व गुन्हे माफ झाले. त्यांची आर्थिक ताकद जणू गंगेतून शुद्ध होऊनच आली आणि इतरांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. हासुद्धा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हल्लाच आहे.”

अशा शब्दात संजय राऊत यांनी गोस्वामी यांच्या अटकेचं जोरदार समर्थन करताना रोखठोकच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

 

After the arrest of Arnav Goswami, Sanjay Raut strongly criticized the BJP