‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला

| Updated on: Nov 24, 2020 | 12:00 PM

'प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणने नामर्दानगी आहे. दिल्लीच नाही तर इंटरपोलची टीम आली तरी काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई करण्याला आम्ही घाबरत नाही', असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

ईडीने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही, अशा इशाराच राऊत यांनी दिला आहे. (Shivsena MP Sanjay Raut warns BJP after raid on Pratap Saranaik’s house)

‘प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर टाकलेला छापा म्हणजे नामर्दानगी आहे. दिल्लीतूनच नाही तर इंटरपोलची टीम आली तरीही काही फरक पडणार नाही. भाजपनं सरळ लढाई करावी. शिखंडीसारखं ईडी किंवा सीबीआयचं बाहुलं हाती धरुन कारवाई केली तरी आम्ही घाबरत नाही’, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. सरकार आणि सरकारशी संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. पण कितीही त्रास द्या, कितीही खोटे गुन्हे दाखल करा, कितीही खोटे कागदपत्र तयार करा, पण शिवसेना किंवा महाविकास आघाडीचा एकही आमदार भाजपच्या हाती लागणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

‘ईडी, सीबीआयनं बाहुलं बनू नये’

ईडी, सीबीआय सारख्या संस्थांनी केंद्रीय सत्तेच्या हातचं बाहुलं म्हणून काम करु नये. महाराष्ट्राला, महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरु आहे. भाजपशासित राज्यात एकही नोटीस का जात नाही? मी 100 लोकांची नावं देतो. त्यांच्याकडे पैसा कुठून येतो? निवडणूक काळात पैशाचे काय व्यवहार होतात? याचाही तपास करा, असं आव्हानच राऊत यांनी ईडीला दिलं आहे.

साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट- राऊत

2 महिन्यात राज्यात सत्तापालट होऊन भाजपचं सरकार येईल, असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यावर साम, दाम, दंड, भेदात आमची डॉक्टरेट झाली आहे. त्यातूनच आमचा जन्म झाला आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेदाची भाषा आमच्यासमोर करु नका, असा दम संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना भरला आहे. पुढील पाच नाही तर आता भाजपनं पुढील २५ वर्षे सत्तेची स्वप्न पाहू नयेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

ED raids on Pratap Sarnaik | ईडीची जय्यत तयारी, सरनाईकांवरील धाडीसाठी पुण्याहून खास फौजफाटा मागवला

“खयालों में जिते रहो, त्यात चार वर्ष निघून जातील”, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

Shivsena MP Sanjay Raut warns BJP after raid on Pratap Saranaik’s house