
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याची चर्चा आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणेंचा सूर आहे. यावरुनच शिवसेनेने राणेंवर निशाणा साधलाय. “शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केलीय. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरु ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं”, असा निशाणा खासदार विनायक राऊत यांनी साधला आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे. कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तर तिसऱ्या क्रमांकावर नारायण राणे यांचं नाव आहे. चिपी विमानतळावरुन शिवसेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. त्यात कार्यक्रमात पत्रिकेत राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर असल्याने राणे रुसल्याची चर्चा आहे. यावरच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधलाय.
“केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कुठे कोण आहे, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील तर त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांना नेमकं कळत नाही की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मागदर्शन मिळेल”, असा खोचक टोला विनायक राऊतांनी राणेंना लगावला. यावेळी “टर्मिनल बिल्डिंगचा लोर्कापण सोहळ्यावेळी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रमुख होते”, अशी आठवणही त्यांनी राणेंना करुन दिली.
“कुणाला बघून आम्हाला कार्यक्रम करायचा नाही. शासकीय पेट्रोकॉलप्रमाणे ज्यांना ज्यांना बोलवणं आवश्यक आहे. त्या सर्वांना मान सन्मानाने बोलावण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. यात फार मोठा योगायोग नाही, इतर जे सांगत होते आम्ही यांना बोलावणार नाही, त्यांना बोलावणार नाही, अशा कुत्सित भावनेतून हा कार्यक्रम नाही. ज्यांचा मान सन्नान आहे त्यांचा मान महाराष्ट्र सरकार करणार आहे. विमानतळाचे श्रेय आम्हाला घ्यायचं नाही तर ते आमचे कर्तव्य आहे”, असं सांगायला देखील विनायक राऊत विसरले नाहीत.
कार्यक्रम पत्रिकेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
chipi airport inauguration
या कार्यक्रम पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात वर आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे. तर राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थात प्रोटोकॉलनुसार हा क्रम देण्यात आला आहे. या आधी राणेंनी चिपीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलेच पाहिजे असं काही नाही असं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक असल्याचं मानलं जात आहे.
राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ठाकरे-राणे एकाच मंचावर येत असल्याने राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
विमानतळाच्या मालकीवरून शिवसेना आणि राणेंमध्ये जुंपली आहे. राणेंनी हे विमानतळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालीच असल्याचा दावा केला आहे. तर राऊत यांनी हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं स्पष्ट केलं. मात्र, विमानतळाचा अधिकार कुणाकडेही असला तरी एखाद्या राज्यात एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन होत असेल तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावचं लागतं. कार्यक्रम पत्रिकेतही मुख्यमंत्र्यांचं नाव टाकावं लागतं.
(Shivsena MP Vinayak Raut Slam Narayan Rane over Chipi Airport inauguration)
हे ही वाचा :
Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणते 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर