‘आदित्य ठाकरे यांच्या सभेत आजही हल्ल्याची शक्यता, तसे inputs…’ ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा!

| Updated on: Feb 09, 2023 | 3:20 PM

अशा हल्ल्यांना आम्ही घाबरलेलो नाहीत. पोलिसांनी यापुढे खबरदारी घ्यावी. पोलिसांकडे CCTV वाहने द्या, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या सभेत आजही हल्ल्याची शक्यता, तसे inputs... ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा!
Image Credit source: social media
Follow us on

अभिजित पोते, पुणेः  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आजच्या सभेतदेखील हल्ला होण्याची शक्यता आहे. तसे इनपुट्स आमच्याकडे आले आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्याने केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिवसंवाद यात्रेदरम्यान मंगळवारी रात्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यासमोर बराच गोंधळ झाला. या गोंधळात दगडफेक झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. आदित्य ठाकरे यांचा अजूनही मराठवाडा दौरा सुरुच आहे. औरंगाबादमध्ये स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं, मात्र आजही तशीच शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त द्यावा, अशी मी गृहखात्याकडे विनंती केली असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात त्यांच्या सभा आहेत.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘ आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सूरू आहे.
त्यांच्या दौऱ्यात दगडफेकी सारखा प्रकार घडला. आज देखिल पोलीसांना तशी माहिती होती. आता मी यात लक्ष घातलं आहे. पोलीसांशी मी बोलले आहे. सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांचं लक्ष सगळीकडे पाहिजे. पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त दिलेला नाही. धमक्यांच्या संधर्भात काहीच पाऊल उचललं नाही. यात्रेदरम्यान पोलिसांकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं नाही, हा अक्षम्य प्रकार असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

‘अंधारात भ्याड हल्ले करणे बंद करा’

हल्लेखोरांना नीलम गोऱ्हे यांनी इशारा दिला आहे. असे अंधारात भ्याड हल्ले करणे बंद करा, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय. अशा हल्ल्यांना आम्ही घाबरलेलो नाहीत. पोलिसांनी यापुढे खबरदारी घ्यावी. पोलिसांकडे CCTV वाहने द्या, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

‘प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला भयंकर’

हिंगोलीत आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री झालेला हल्ला भयंकर असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्यांनी आरोप केला की, हा इसम दोन सभेपासून त्यांच्या सोबत फिरत होता. तो विचारत होता की प्रज्ञा सातव कोण आहेत?

आमदारांना स्वतः चं रक्षण करावं लागत आहे, ही गंभीर बाब आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता, यामागे राजकीय नेत्यांचा हात असण्याची शक्यता आहे. ही बाब चिंताजनक आहे, मी याबाबत गृह सचिवांशी बोलले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील बोलणार आहे, असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय.