एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत

| Updated on: Oct 04, 2020 | 9:06 AM

एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला जातो, अशी टीका शिवसेनेने केली आहे. (Shivsena question on BJP and Kangana Ranaut)

एका नटीसाठी एक कायदा, बेटीच्या देहाची मात्र विटंबना : संजय राऊत
Follow us on

मुंबई : ‘बेटी बचाव’च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार आणि हत्या झाली. हिंदू मुलींना पळवून बलात्कार आणि हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला जातो, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून याबाबतचा लेख प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात कंगना रनौतसह भाजपवर टीका करण्यात आली आहे.  (Shivsena question on BJP and Kangana Ranaut on Hathras Uttar Pradesh Gang rape)

“ती कोण? तिचे काय झाले? हे आता निदान अर्ध्या जगाला कळले आहे. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या. ते सर्व लोक तिच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. 19 वर्षाच्या निर्भयावर उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार गुंडांनी तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. त्यात ती मरण पावली. तिला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा ‘मीडिया’देखील कंठशोष करताना दिसला नाही. का? असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

ती – ड्रग्ज घेत नव्हती. ती – स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती. ती – झोपडीत राहत होती आणि तिने कोटय़वधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते. तिचे कोणाबरोबर ‘अफेयर’ नव्हते. ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही!  असा टोलाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महान महात्मे बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य

“बलात्कारपीडित महिलेचे नाव समोर आणू नये हे संकेत आहेत. पण ते तिच्या इस्पितळातील छायाचित्रांसह समोर आले आहे. हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्म्ये उभे राहिले. ते हाथरस बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य झाले. या सर्व प्रकारात अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत.” असेही संजय राऊत म्हणाले.

महिला आयोग गप्प का? 

“महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती.

राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना रनौत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला.” असेही संजय राऊत म्हणाले. (Shivsena question on BJP and Kangana Ranaut on Hathras Uttar Pradesh Gang rape)

संबंधित बातम्या : 

हाथरस, बलरामपूरप्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा भाजपला सवाल

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी