…ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर…, संजय राऊतांचा अग्रलेखातून भाजपला इशारा

| Updated on: Jan 19, 2021 | 7:44 AM

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय.

...ग्रामपंचायतीचा कौल मान्य करा नाही तर..., संजय राऊतांचा अग्रलेखातून भाजपला इशारा
Sanjay raut
Follow us on

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय. (Shivsena Sanjay Raut taunt bjp Over Gram Panchayat Election)

“ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ ना हाताशी धरुन महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडवता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला , हवा येऊ द्या!”, अशा शब्दात राऊतांनी टोलेबाजी करत भाजपला डिवचलं आहे.

महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे, असं राऊत म्हणाले.

भाजपचे गडकिल्ले ढासळले, भलेभले पडले- राऊत

“भाजपचे ग्रामपंचायतींचे निकाल हा राज्याच्या जनतेचा कौल आहे. ग्रामपंचायती म्हणजे गाव खेड्यातल्या, पाड्यावरच्या विधानसभाच आहेत. त्या निवडणुकीत राज्याची जनता मतदान करते. आजपर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात 20 वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत.”

“रोहित पवार यांनी चौंडी गावची ग्रामपंचायत जिंकून आणली आहे. शिंदे हे अहिल्याबाई होळकरांचे वंशज व चौंडी हे अहिल्याबाईंचे जन्मस्थान. त्यामुळे जनतेने भाजप पुढाऱ्यांची सत्ता कशी उलथवून टाकली ते समजून येते. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सर्वच पक्षांतील वजनदार लोकांना, प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के बसले आहेत, पण जगातील नंबर एकचा तोरा मिरविणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली आहे.”

विरोधकांच्या जहरी प्रचाराचा परिणाम लोकांवर झाला नाही- राऊत

“कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे. विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”

ग्रामपंचायत निवडणुकीने भाजपचा भ्रमाचा फुगा फोडला- राऊत

“पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही. आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेची पावले योग्य दिशेनेच पडत आहेत. भुलभुलैयांच्या धुक्यातून ती बाहेर पडली आहे. पंतप्रधान मोदी हे देशभर पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत, पण महाराष्ट्रावर उद्धव ठाकरे यांचेच गारुड आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गावातील ग्रामपंचायत जिंकू शकले नाहीत. रावसाहेब दानवेंनी भोकरदन गमावले आहे. नागपूर ग्रामीणला अनिल देशमुखांनी बाजी मारली आहे. फक्त आम्हीच, दुसरा कोणी नाही असा तोरा मिरविणाऱ्यांचा हा पराभव आहे.”

हे ही वाचा

एकनाथ शिंदेंच्या रणनितीचा फायदा, चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी

Jalgaon Gram Panchayat Election Results 2021 | जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी