उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर

| Updated on: Nov 01, 2020 | 11:52 AM

काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा, असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला

उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : केसरकर
Follow us on

सिंधुदुर्ग : “कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (मनोहर पर्रिकर) यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोट माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चांनंतर केसरकरांनी स्पष्टीकरण दिलं. (Shivsensa Leader Deepak Kesarkar clarifies on rumors of joining BJP)

“मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं” अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.

“मी कोकणातील दहशतवादाविरोधात लढणार असून तो केवढाही मोठा माणूस असो, मी त्या विरुद्ध उभा राहणार आहे. मी भाजपमध्ये जाणार, या केवळ अफवा होत्या. माझी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. पण आपण कधीही शिवसेना सोडून जाणार नाही, हे त्यावेळीच स्पष्टपणे सांगितले होतं. आजही स्पष्ट करतो की मी कधीही शिवसेना सोडून जाणार नाही. मला त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं. कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. यावेळी गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोटही दीपक केसरकर यांनी केला.

“मंत्रिपदाबाबत मी नाराज नाही, तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं शंभर टक्के दुःख आहे. वैभव नाईकांना मंत्रिपद दिलं असतं. मी त्यावेळी सांगितलं होतं, की मला मंत्रिपद दिल्यास तीन वर्षात चांदा ते बांदा विकास करुन मी राजीनामा दिला असता आणि वैभव नाईक यांना मंत्रिपद देण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली असती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याचं समाधान आहे.” असेही केसरकर म्हणाले.

राणेंना टोला

“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही नेते जीडीपीबद्दल बोलतात, पण त्यांनी आधी जीडीपीचा फुल फॉर्म सांगावा” असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला. उंदीर आणि टोपीची उपमा देत दीपक केसरकर यांची राणेंवर निशाणा साधला. (Shivsensa Leader Deepak Kesarkar clarifies on rumors of joining BJP)

“ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात स्टाफ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का?” असा प्रश्नही केसरकरांनी उपस्थित केला. अशा लोकांकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष देऊ नये, असंही केसरकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज

(Shivsensa Leader Deepak Kesarkar clarifies on rumors of joining BJP)