Uday Samant | उदय सामंत टक्केवारीने कामं करतात, राणे समर्थकांना पोसतात, कोकणातून विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप

| Updated on: Aug 16, 2022 | 2:13 PM

विनायक राऊत यांच्या आरोपानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. एकेकाळचे मित्र असलेल्या या दोघांमध्ये शिवसेनेतील बंडखोरीमुळे तीव्र मतभेद झाले आहेत.

Uday Samant | उदय सामंत टक्केवारीने कामं करतात, राणे समर्थकांना पोसतात, कोकणातून विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
शिवसेना खासदार विनायक राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सिंधुदुर्ग | कोकणात विनायक राऊत (Vinayak Raut) आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्यातील वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कणकवलीत शिवसेनेच्या एका कार्यक्रमात विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. पालकमंत्री असताना उदय सामंत हे टक्केवारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील (Ratnagiri) पालीच्या घरातून उदय सामंत करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. एवढेच नाही तर आमदार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला 50 लाख रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक नुकतीच कणकवलीत पार पडली. यावेळी हा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

विनायक राऊत काय म्हणाले?

शिवसेना कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना विनायक राऊत म्हणाले, ‘ राज्यात कुठेही घडत नाही, असे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथे घडते. पैसे घेऊन जा, निवडणुकांना तिकिट देतो… पण माझ्याकडे अशा पद्धतीचा घाणेरडा प्रकार इथे होतो. ४० आमदार फुटले त्यापैकी ३९ आमदारांनी कधीही केला नसेल असा प्रकार इथे होतो. अडीच वर्षात त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचं काम केलं. एवढंच नाही तर वैभव नाईक यांच्या विधानसभा निवडणुकीतही विरोधातील उमेदवाराला ५० लाख रुपये देऊन पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण वैभव नाईक हे अख्ख्या सिंधुदुर्गाचं वैभव आहे. दीपक केसरकर, उदय सामंत मंत्री झाले, त्यांना शुभेच्छा.. पण सामंत इथे पालकमंत्री असताना टक्केवारी घेऊन कामं करत होते…

‘वॉटर प्युरिफायर घोटाळा अंगलट येणार’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वॉटर प्युरिफायर आणि भूमी घोटाळा यात खऱ्या अर्थाने जो अधिकारी होता, त्याच्या चौकशीचा अहवाल सादर करायचा होता, तेव्हा पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अडकू नयेत, म्हणून ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. वॉटर प्युरिफायर घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांचे घोटाळ्याचे आदेश काढण्यात आले. त्यातले 20 टक्के पालकमंत्र्यांचे होते. मात्र या घोटाळ्याचे आरोप त्यांची पाठ सोडणार नसल्याचं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय.

विनायक राऊत विरुद्ध उदय सामंत वाद उफाळणार

विनायक राऊत यांच्या आरोपानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. एकेकाळचे मित्र असलेल्या या दोघांमध्ये शिवसेनेतील बंडखोरीमुळे तीव्र मतभेद झाले आहेत. विनायक राऊतांनी उदय सामंतांना गद्दार ठरवत पक्षाचं संपर्क कार्यालय मागील महिन्यात सोडलं. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या कार्यालयात हे कार्यालय असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी आज उदय सामंतांविरोधात गंभीर आरोप केलेत.