अजित पवारांच्या वक्तव्याला विशेष काही अर्थ नाही; ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं भाष्य

| Updated on: May 22, 2023 | 12:16 PM

Prithviraj Chavan on Ajit Pawar Statement : अजित पवार यांचं वक्तव्य, जागा वाटप अन् आगामी निवडणुका; पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर प्रतिक्रिया

अजित पवारांच्या वक्तव्याला विशेष काही अर्थ नाही; त्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं भाष्य
Follow us on

सोलापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी याआधीच्या निवडणुका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून येणारे आमदार यावर भाष्य केलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आगामी निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलंय. दोन हजाराची नोट पुन्हा बँकेत जमा करण्याचे आदेश रिजर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडे जास्त जागा असायच्या त्यामुळे काँग्रेस मोठा भाऊ होता. पण आता राष्ट्रवादीकडे जास्त जागा आहेत. त्यामुळे आम्ही मोठा भाऊ आहोत, असं अजित पवार अजित पवार म्हणाले होते. यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. नाना पटोले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांच्या स्टेटमेंटला विशेष काही अर्थ नाही. भाजपला पराभूत कोण करतं हे सध्या महत्त्वाचं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतात. त्यात काही गैर नाही. आजच्या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यामुळं विधान करण्यामध्ये काही चुकीचं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जागा वाटापामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन सूत्र वापरत होतो. आतापर्यंत जे जे निकाल आहेत. त्याचा सारासार विचार करून जागा वाटपाचा निर्णय होईल. या घडीला भाजपाला कोणता पक्ष पराभूत करेल यावर चर्चा करणे गरजेचे आहे.त्यामुळे ह्या स्टेटमेंटला फार काही विशेष अर्थ नाही, असं ते म्हणालेत.

आगामी निवडणुकांमधील जागावाटप कसं असणार? असं विचारलं असता, जागा वाटपाकरता गंभीरतेने तिन्ही पक्ष बसून एक सूत्र ठरवू, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

नरेंद्र मोदींनी भारतात कॅशलेस सोसायटी आणण्याचा प्रयत्न केला मात्र जगभरात तो प्रयोग फेल झालेला आहे. देशातील रोकड संपून टाकायचं दिवा स्वप्न मोदींनी पाहिलं. पहिल्या नोटबंदीचा निर्णय हा अतिशय अविचारी होता. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं, असं म्हणत नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीये.

देशात दोन हजाराची नोट काळा पैसा ठेवण्यासाठी वापरात आणली जात होती. भाजपच्या नेत्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला. पुढच्या निवडणुकांच्या आधी या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. परंतु लोकांना त्रास होईल. कर्नाटकातील दारून झालेल्या पराभवानंतर मोदी सरकार गडबडलेला आहे. मोदींचं काय चाललंय हे समजत नाही मात्र ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत हे निश्चित. मोदींची जादू आता चालत नाही हे निश्चित आहे. पुढच्या निवडणुकीत याचा परिणाम निश्चित दिसेल, असंही ते म्हणालेत.