घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, दोन दिवस राज्यव्यापी आंदोलन

| Updated on: Jul 02, 2021 | 11:46 AM

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.

घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, दोन दिवस राज्यव्यापी आंदोलन
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे. (Statewide agitation of NCP against domestic gas, fuel price hike, inflation)

सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडला पाहिजे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्रसरकारने निर्माण केले आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवले. 20 दिवसाला 809 रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

जगावं की मरावं असा प्रश्न हॅम्लेटच्या नाटकात विचारला होता. मोदींच्या केंद्रसरकारमुळे वाढलेल्या महागाईनं व इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून पडलं आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’ मध्ये दिसते त्यावेळी ते ‘मरावंच’ असं दिसत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय.

‘सहकार क्षेत्र संपवण्याचा भाजपचा घाट’

जयंत पाटील यांनी नांदेडमध्ये केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केला होता. केंद्र सरकार सहकार क्षेत्र संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. गोरगरीब, खेड्यातील सामान्य माणूस, शहरातील माणसं आणि मध्यमवर्गीय एकत्र येऊन अतिशय चांगल्या पध्दतीने बॅंका चालवतात. त्या बॅंकांवर निर्बंध आणणं चुकीचं आहे. रिझर्व्ह बॅंकेचं हे धोरण निषेधार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सहकार क्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न करत, अशा शब्दात पाटील यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडलं होतं.

दरम्यान सीबीआय, ईडीनंतर आता रिझर्व्ह बॅंकेचा दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘आता तुम्हीच समजून जा’ असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. खाजगी बॅंका सामान्य लोकांना दारात उभ्या करत नव्हत्या, असं लक्षात आल्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले. सहकार म्हणजे सामान्य लोकांनी एकत्र येऊन निर्माण केलेली शक्ती. त्या शक्तीतून अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत. परंतु भाजपला महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील सहकार मोडून काढायचा आहे. मोदीसाहेबांशिवाय कुणी काही काम केले नाही पाहिजे, अशी भावना भाजपची असल्याची टीकाही पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

‘नव्या पिढीला भीती वाटतीय, लक्ष घाला’, पडळकरांविरोधात रोहित पवारांची थेट मोदी-नड्डांकडे तक्रार

निवडणूक व्हायला नको होती, पण कितीही आपटा, जिंकणार तर आम्हीच: संजय राऊत

Statewide agitation of NCP against domestic gas, fuel price hike, inflation