….तर भाजपने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावं : सुब्रमण्यम स्वामी

| Updated on: Jun 19, 2020 | 3:27 PM

महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy on Thackeray Government) यांनी ट्विटरवर मोठं वक्तव्य केलं आहे.

....तर भाजपने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावं : सुब्रमण्यम स्वामी
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy on Thackeray Government) यांनी ट्विटरवर मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावं, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत Subramanian Swamy on Thackeray Government).

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, अशी नाराजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठकही झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली. हे नाराजी नाट्य जवळपास गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रहितासाठी भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊन पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन करावं”, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी याअगोदरही अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याचा सल्ला दिला होता.

“आता किंवा कधीच नाही, उद्धव ठाकरे, आताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेली युती तोडा, अन्यथा ते तुम्हाला कट रचल्याप्रमाणे उद्ध्वस्त करतील” अशा आशयाचे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते.

काँग्रेसची नेमकी खदखद काय?

दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काल (18 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत चर्चा सकारात्मक झाल्याचं स्पष्ट केलं.

“मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली, आमची काही नाराजी नाही, वादाचा कोणताही विषय नाही. आमच्या काही प्रशासकीय मागण्या होत्या. कोणत्याही व्यक्तीगत मुद्दा नव्हता” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केलं जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्या प्रमाणात मंत्री झाले. पण पुढचे वाटप समसमानच ठरलं होतं. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याचा वैयक्तिक विषय नाही” असं थोरातांनी स्पष्ट केलं.

‘न्याय्य योजना’ काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांनी देशासाठी मांडली आहे. पण गरीब माणसाला काही मदत करता येते का हे पाहायला हवं, असंही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आमची काही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : काँग्रेस

 शिवसेना खासदार अनिल देसाई थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?