‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंवर राज्यभर टीका, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मात्र पाठराखण; म्हणाले…

| Updated on: Dec 10, 2020 | 5:11 PM

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे; याबद्दल दानवेंना माहीत असेल. कारण ते मंत्री आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar Raosaheb Danve)

त्या वक्तव्यावरुन दानवेंवर राज्यभर टीका, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मात्र पाठराखण; म्हणाले...
Follow us on

मुंबई : “शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे; याबद्दल त्यांना माहीत असेल. कारण रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे केंद्रीय मंत्री आहेत,” असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रावसाहेब दानवे यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नाही. तर या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावर खळबळ माजली. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील अनेक नेत्यांनी निषेध केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र दानवेंची पाठराखण केली आहे. (Sudhir Mungantiwar on Raosaheb Danves controversial statement)

“दानवे यांच्या वक्तव्याशी सहमत किंवा असहमत असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सध्याच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे, याची त्यांना माहिती असेल, कारण दानवे केंद्रीय मंत्री आहेत,” असे मुनगंटीवार म्हणाले. तसेच, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातसुद्धा अनेकदा परकीय शक्तींचा हात असल्याचं बोललं जायचं, अशी पुष्टीही त्यांनी दानवे यांच्या समर्थनार्थ जोडली.

तुम्ही आंदोलन केल्यावर कोरोना वाढत नाही का?

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. हाच मुद्दा घेऊन शिवसेनेने मुंबईत गुरुवारी (10 डिसेंबर) रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनावर सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली. “भाजपने राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली, तेव्हा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली. त्यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढेल असे कारण समोर केलं. आता शिवसेना पेट्रोल दरवाढीसाठी आंदोलन करत आहे. यावेळी कोरोना संसर्ग वाढत नाही का?,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. तसेच, इंधन दरवाढीचे भाव इंधन कंपन्या ठरवतात. आम्ही सत्तेत असताना राज्याचा कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता, असेही मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar on Raosaheb Danves controversial statement)

ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत (Clash Between BJP And TMC). त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. जेपी नड्डा हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते. यावेळी जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना “जेंव्हा विचारांची लढाई संपते तेंव्हा असे हल्ले केले जातात. जेंव्हा एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष एखाद्या जिल्ह्यात जातो,  तेंव्हा त्या अध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या राज्यावर असते,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. (Sudhir Mungantiwar on Raosaheb Danves controversial statement)

संबंधित बातम्या :

दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा, चेक करावा लागेल; बच्चू कडू यांची घणाघाती टीका

कृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा