गोपीनाथ मुंडेंच्या कन्येनं ‘ते’ विधान करावं हे अत्यंत दुर्देवी: सुनील केदार

| Updated on: Jun 04, 2021 | 4:59 PM

ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. (sunil kedar reaction on pankaja munde's statement)

गोपीनाथ मुंडेंच्या कन्येनं ते विधान करावं हे अत्यंत दुर्देवी: सुनील केदार
sunil kedar
Follow us on

रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी, पंढरपूर: ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. त्यावर राज्याचे पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांचं हे विधान अत्यंत दुर्देवी आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनी हे विधान करावं हे अधिक दुर्देवी आहे, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. (sunil kedar reaction on pankaja munde’s statement)

राज्यातील माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची पैदास वाढवण्यासाठी पशू संवर्धन विभाग काम करत आहे. यासाठी आज महूद येथील शेळी मेंढी पालन प्रक्षेत्र येथे पाहणी करण्यासाठी पशू संवर्धन मंत्री सुनील केदार आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकारणासाठी मतांसाठी राजकारण जरूर करा. पण सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नांवर बोलताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने केविलवाणं वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे, असं केदार म्हणाले. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना महाराष्ट्र मुक्त करण्यात आलं हे काय कमी आहे का? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

मतांसाठी राजकारण जरूर करा, पण…

पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. मंत्री म्हणून अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. ओबीसींच्या नेत्या म्हणून त्या प्रतिनिधित्व करत असताना अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. राजकारणासाठी राजकारण जरूर करावं, मतांसाठी राजकारण करावं, पण समाजाच्या संवेदनशील प्रश्नावर बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्या घरातून अशा पद्धतीचे वक्तव्य येणे हे दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल? या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील. आरक्षण नसेल तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाहीत. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली होती.

जनगणनेची गरज नाही

मराठा आरक्षण असो वा ओबीसी आरक्षण असो सरकार फेल ठरलं आहे. सरकार आणि कॅबिनेट शक्तीशाली असत. अजूनही ओबीसी आरक्षणाचा मार्ग काढू शकता. मागास आयोग नेमून ओबीसी आरक्षण अबाधित ठेवू शकता. कॅबिनेटमध्ये उपसमिती स्थापन करून हा निर्णय घेण्याची गरज आहे. ओबीसींची जनगणना हा मुद्दा वेगळा आहे. इथे इम्पेरिअल डाटा आवश्यक आहे. हा राज्याचा विषय असल्याने जनगणना न करता इम्पिरिकल डाटाच्या आधारे आरक्षण देता येऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. (sunil kedar reaction on pankaja munde’s statement)

 

संबंधित बातम्या:

OBC आरक्षण: सरकारची आरक्षणाची मानसिकताच नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

‘भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला, आता चोराच्या उलट्या बोंबा’, पटोलेंचा पलटवार

Maharashtra News LIVE Update | मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नको : पंकजा मुंडे

(sunil kedar reaction on pankaja munde’s statement)