डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला

| Updated on: Jun 01, 2021 | 5:05 PM

जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, फडणविसांचा टोला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा
Follow us on

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळामुळे झालेल्या शेती आणि केळीबागेच्या नुकसानाची पाहणी हे फडणवीसांच्या दौऱ्याचं मुख्य कारण होतं. मात्र यावेळी पत्रकारांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपला नाही, असा दावा फडणवीस यांनी केलाय. (Thackeray government needs damage control- Devendra Fadnavis)

रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्यावर त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं. माझ्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो. त्यामुळे यात कुणीही वावगं समजण्याचं कारण नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोलची गरज या सरकारला आहे. ठाकरे सरकारवर रोज लागणारे आरोप, सरकारची झालेली अवस्था आणि नुकताच लागलेला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, त्यामुळे या सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. आपला जळगाव दौरा फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊतांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’

फडणवीस आणि शरद पवार भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राऊतांना टोला हाणलाय. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. याचा वाईट अर्थ घेऊ नका, ते चांगले संपादक आहेत. पण ते नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न सातत्याने पडतो. त्यातच आता सामनाच्या मुख्य संपादक आमच्या वहिनी म्हणजे रश्मीताई ठाकरे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची अवस्था सध्या ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली असल्याची टीका फडणवीसांनी केलीय.

‘सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी’

जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. मागच्या नुकसानाचे पैसे अजून मिळाले नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. कोकणात सरकार धावलं पण आपल्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पीक विमा उतरवला जात नाही. विमा कंपन्यांचे लोक पोहोचत नाहीत. जिथे जातात तिथे कमी नुकसान दाखवत आहेत. योग्य नुकसान दाखवण्यासाठी त्या लोकांकडून पैशांची मागणी होतेय. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केलीय.

संबंधित बातम्या :

शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिक म्हणतात…

ओबीसींसाठी सध्या राज्यात कोणतंच आरक्षण उरलं नाही; देवेंद्र फडणवीसांचा दावा

Thackeray government needs damage control- Devendra Fadnavis