धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

| Updated on: Jan 15, 2021 | 12:49 PM

एरवी कोणत्याही मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या भाजपनेही (BJP) याप्रकरणात कधी नव्हे ती अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. | Dhananjay Munde

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?
Follow us on

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एरवी कोणत्याही मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या भाजपनेही (BJP) याप्रकरणात कधी नव्हे ती अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. किंबहुना धनंजय मुंडे प्रकरणावरुन भाजपमधील नेत्यांमध्येच दोन तट पडल्याचे दिसते. (Two groups between BJP leaders over Dhananjay Munde case)

यापैकी एका गटातील चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून धनंजय मुंडे यांची आमदारकीच रद्द करावी, असे म्हटले आहे.

मात्र, दुसऱ्या बाजूला राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कमालीची सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे फडणवीस यांनी म्हटले होते. तर मुंबईतील भाजपचा आणखी एक आक्रमक चेहरा असणाऱ्या आशिष शेलार हेदेखील अद्याप या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

विरोधकांना लक्ष्य करताना भाजप नेत्यांच्या भूमिकेमध्ये इतकी तफावत क्वचितच आढळून येते. अन्यथा एरवी लहानसहान मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या भाजपने हा मुद्दा चांगलाच तापवला असता. मात्र, अनेक वर्षे राजकारणात असल्यामुळे धनंजय मुंडे यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. त्यामुळेच भाजपसह अन्य पक्षांचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका करणे टाळत असावेत, असा जाणकारांचा अंदाज आहे.

अजित पवारांशी जवळीक

ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु होत्या, त्यावेळी अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं होतं. सत्तेचं समीकरण जुळलं असताना अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेच शपथविधी उरकला होता. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार दिसले होते. मात्र पहाटेच्या शपथेनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता दिवसभर गायब होता, तो नेता म्हणजे धनंजय मुंडे. अजित पवार हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना पवारांकडून तूर्त अभय मिळाल्याचीही चर्चा आहे.

धडाडीचे नेते आणि कार्यक्षम मंत्री

ओबीसी समाजाचा मोठा नेता म्हणून धनंजय मुंडेंची ओळख आहे, राष्ट्रवादीचे ते धडाडीचे नेते आणि प्रचारक आहेत. सामाजिक न्याय मंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून दर महिन्याला कामाचा अहवाल देणारे ते एकमेव मंत्री आहेत. कालही जनता दरबारला उपस्थित राहून त्यांनी जनता आणि कामाच्या प्रती आपली तळमळ दाखवली. स्वच्छ प्रतिमेमुळे धनंजय मुंडेंवरील कारवाई तूर्त टळल्याचं दिसतं.

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट

(Two groups between BJP leaders over Dhananjay Munde case)