छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची चर्चा

| Updated on: Oct 14, 2022 | 12:01 AM

छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर मुख्यमंत्री झाले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची चर्चा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम तसा, भुजबळांच्या पंचाहत्तरीचा होता. पण गाजवला उद्धव ठाकरेंनी. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर मुख्यमंत्री झाले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भुजबळांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त, प्रत्येकांनी भुजबळांच्या आठवणी सांगितल्या. अजित पवारांनी भुजबळ, सरकार वाचवण्यात कसे पटाईत आहेत, हे उदाहरण देऊन सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आधीच सांगायला हवं होतं असा टोला लगावला.

शिवसेनेला पुन्हा मशाल चिन्हावर लढण्याची वेळ आलीय. याच चिन्हावरुन भुजबळही 1985 मध्ये शिवसेनेकडून लढले आणि जिंकलेही. ती आठवण सांगताना प्रफुल्ल पटेलांनीही उद्धव ठाकरेंना उद्देशून, हशा पिकवला.

छगन भुजबळांनी राजकीय कारकीर्द शिवसेनेपासूनच सुरु झाली. महापौरांपासून ते आमदार भुजबळांना शिवसेनेनंच केले. भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेबांनाही मानसिक धक्का बसला होता, हेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

सध्या उद्धव ठाकरेंसाठी कसोटीचा काळ आहे. पण, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस भक्कमपणे उभी आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानापाठोपाठ, ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्गही मोकळा झाला. त्यावरुन अजित पवारांनी सत्याचाच विजय होत असल्याचं म्हटलं, त्यानंतर ठाकरेंनी शिंदे आणि भाजपला आव्हान दिले.

भुजबळ मुंबईतले शिवसेनेचे पहिले महापौर झाले. मात्र, त्याचवेळी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी, त्यावेळी बाळासाहेबांच्या मतांच्या विरोधात जावून शिवसेना कशी सोडली ?, तो किस्साही भुजबळांनी सांगितला.

भाषण म्हटलं भुजबळ आपल्या हटके स्टाईलनं फटकेबाजी करतातच. आपल्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमातही भुजबळांचा बिनधास्त अंदाज दिसला.