काँग्रेस पक्ष संपलाय, अजूनही हॉलिडे मूडमध्ये राहिले तर कल्याणच होईल: प्रकाश आंबेडकर

| Updated on: Nov 24, 2020 | 4:08 PM

गेल्यावर्षीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करायला तयार होती. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. | Prakash Ambedkar

काँग्रेस पक्ष संपलाय, अजूनही हॉलिडे मूडमध्ये राहिले तर कल्याणच होईल: प्रकाश आंबेडकर
Follow us on

सांगली: काँग्रेस पक्ष हा आता जवळपास संपला आहे. यानंतरही काँग्रेसला (Congress) अजूनही हॉलिडे मूडमध्येच राहायचे असेल तर कल्याण आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. दोन निवडणुकांमध्ये आम्ही काँग्रेसला वाचवले होते. गेल्यावर्षीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करायला तयार होती. मात्र, त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. (Prakash Ambedkar take a dig at Congress)

ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ‘वंचित’ने त्यांच्याशी युती केली नाही. आम्ही केवळ हरलेल्या जागा मागितल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यताही आंबेडकर यांनी पुन्हा एकदा बोलून दाखविली. राज्य सरकार हे काही गोष्टी स्वत:वर ओढवून घेत आहे. राज्य सरकार केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर विद्रोह आहे. ही गोष्ट घटनाबाह्य आहे. त्यामुळे केंद्र सरकार कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करु शकते, असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविला.

हवापालटासाठी सोनिया आणि राहुल गांधी गोव्यात

दिल्लीची हवा मानवत नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. राहुल गांधीही त्यांच्यासोबत गोव्यात आले आहेत. साधारण एक आठवडा मायलेक गोव्यात राहतील, असे सांगितले जात आहे.

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षातही सध्या विरोधाचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा आणि विविध राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र, यानंतरही पक्षनेतृत्त्वाकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसकडून काही पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, आता सोनिया गांधी आणि राहुल गांधीच दिल्लीत नसल्याने ही प्रक्रिया लांबवणीवर पडली आहे.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये काँग्रेसचा ‘निकाल’ लागल्याने राहुल गांधींची जैसलमेरची हॉलिडे ट्रिप रद्द?

दिल्लीची हवा बिघडली; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात

उद्धव ठाकरेंनी सांगावं, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल

(Prakash Ambedkar take a dig at Congress)