Video : विरोधक म्हणतात हे सरकार तीन चाकी रिक्षा, अजित पवारांनी चक्क इलेक्ट्रीक रिक्षाच चालवून बघितली!

| Updated on: Aug 28, 2021 | 8:37 PM

आता वाहन निर्मिती कंपन्यांकडूनही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाचं हँडल हाती घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा चालवली आणि राज्यभरात या रिक्षा राईडची चर्चा रंगली.

Video : विरोधक म्हणतात हे सरकार तीन चाकी रिक्षा, अजित पवारांनी चक्क इलेक्ट्रीक रिक्षाच चालवून बघितली!
अजित पवारांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली
Follow us on

बारामती : इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जातोय. या पार्श्वभूमीवर आता वाहन निर्मिती कंपन्यांकडूनही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाचं हँडल हाती घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा चालवली आणि राज्यभरात या रिक्षा राईडची चर्चा रंगली. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. तसंच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पातंर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार जळोची येथे अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या दौऱ्यात अजित पवार यांनी पियाजो कंपनीलाही भेट दिली. (Ajit Pawar drove an electric rickshaw of Piaggio Company)

पियाजो कंपनीला भेट दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांना आपल्या नव्या उत्पादनाबाबत माहिती दिली. नव्या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर अजितदादांना रिक्षा चालवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट रिक्षाचं हँडल हातात घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा कंपनीच्या आवारातच चालवली. अजितदादांना रिक्षा चालवताना पाहून कंपनीचे कर्मचारीही अवाक झाले होते. यावेळी अजितदादांनी या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि कंपनीच्या या उत्पादनाचं कौतुकही केलं.

जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन

जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामांची उजळणी केली. 1967 सालापासून शरद पवार यांनी पाणी प्रश्नावर काम केलं. बारामती हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. अनेक ठिकाणी पाण्याची मोठी समस्या होती. विविध भागात असलेली पाण्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तलावांची कामं मार्गी लावली. अनेकजणांना या कामांसाठी गळ घातली. काहीजण दिवसा हो म्हणायचे आणि रात्री बदलायचे. कुणीतरी तिथं बोटं घालायचं काम करत होतं. अनेकांनी कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचं अजित पवार म्हणाले.

‘काही जित्राबं लय वाईट असतात’

कोरोना काळ असला तरी लोकांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. काही जित्राबं लय वाईट असतात. आता कालव्याला दोन महिने पाणी आलं नाही तरी पाण्यासाठी भटकंती होऊ नये अशा प्रकारची योजना आखली आहे. जिरायती भागासह तालुक्याच्या विविध भागात पाण्याच्या योजना राबवल्या आहेत. राज्याची आर्थिक स्थिती घरसली आहे. पण तरीही विकासकामं थांबू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामं करायची झाली तर जमिनी जातात. जमिनी दिल्या म्हणून कामं मार्गी लागतात. पण त्याचा मोबदलाही चांगला दिला जाईल. कुणीतरी दलाल आला तर त्याला जमिनी विकू नका. जमिनी घेताना सरकार चार पट दर देतं. तुमच्या जमिनी जात असतील तर त्याचे पैसे मिळतील. विकास करायचा असेल तर थोडं सोसावं लागेल, असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना केलं.

इतर बातम्या :

Video : जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जोरदार शॉक!

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा, मृतदेह खाटेवर टाकून नेण्याची वेळ, नागरिकांत संताप

Ajit Pawar drove an electric rickshaw of Piaggio Company